पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या सरकारचा आणि कार्यकाळातील अंतिम पाचवा अहवाल शुक्रवारी जाहीर केला. मागास राज्य अशी ओळख असलेल्या बिहारचा आपल्या सरकारने चौफेर विकास केल्याचा दावा त्यांनी केला आहे. विकासाची गती अशीच कायम राखण्यासाठी जनतेने पुन्हा आपल्याला संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात येत्या तीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या कारकिर्दीत अंमलबजावणी करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. या वेळी सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाचे अन्य नेतेही बरोबर होते.
नितीशकुमार यांनी सांगितले, की केंद्रीय सांख्यिकी संचालनालयाने बिहारचा विकास दर 16.59 टक्के असल्याचे प्रसिद्ध केले आहे. अर्थात, आम्ही या आकड्यांचे समर्थन करीत नाही. त्यांनी प्रसिद्ध केलेली माहिती आम्ही फक्त लोकांपुढे मांडत आहोत, असेही ते म्हणाले. गेल्या साडेचार वर्षांत सरकारने राज्यात सुमारे साडेचार लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. बेरोजगारांना यापुढेही राज्यात पोलिस, शिक्षक यांसह अन्य नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. संस्कृत आणि ऊर्दू शिक्षकांची नव्याने भरती केली जाईल, तसेच प्रत्येक शाळेत ऊर्दू शिक्षक असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात कायदा प्रस्थापित झाला. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. बेकायदा जमा केलेली संपत्ती गोठविण्याचे सुमारे दहा गुन्हे नोंदविण्यात आले. अशा प्रकारे कठोर कारवाई करणारे बिहार देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावाही नितीशकुमारांनी केला.
सुमारे दीड तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत नितीशकुमारांनी पत्रकारांसाठीही योजना जाहीर केल्या. गेल्या महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविणारे मंत्री गिरिराजसिंह आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेसुद्धा या वेळी उपस्थित होते; परंतु त्यांच्यापैकी कोणालाही बोलण्याची संधी मिळू शकली नाही.
"रिपोर्ट कार्ड' जाहीर करून नितीशकुमारांनी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या "रिपोर्ट कार्ड'वर विरोधकांनी टीका केली आहे. नितीशकुमारांच्या सरकारला जनता निवडणुकीत "रिपोर्ट कार्ड' दाखवेल तेव्हा त्यांची धुंदी उतरेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. चुकीच्या तत्त्वांवर हे "रिपोर्ट कार्ड' आधारलेले आहे. याचा वास्तवतेशी काहीही संबंध नसल्याचे मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रेमचंद मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा जाहिरातबाजी
"रिपोर्ट कार्ड' जाहीर करणार असल्याने नितीशकुमारांनी शुक्रवारी येथील सर्व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये तीन पानांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. या जाहिरातींत बिहारला "शायनिंग'च्या रूपात दाखविण्यात आले. मात्र, यात नितीशकुमार यांच्या एकट्याचेच छायाचित्र छापण्यात आले.
Follow
Us on
Twitter