भारताचा आजपासून अध्यक्षीय संघाशी सामना
वृत्तसंस्था
Tuesday, July 13, 2010 AT 12:27 AM (IST)
कोलंबो - येथील कोल्ट्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर मंगळवारपासून भारत आणि श्रीलंका अध्यक्षीय संघ यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना होत आहे. एरवी या सामन्याला सरावाचेच महत्त्व असते, पण दोन्ही संघांच्या गोलंदाजांसाठी ही लढत फार महत्त्वाची बनली आहे. भारताच्या गोलंदाजांशिवाय लंकेच्या अजंता मेंडीसच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
अजंताची पहिल्या कसोटीसाठी निवड करण्यात आलेली नाही. या कसोटीनंतर मुथय्या मुरलीधरन निवृत्त होणार आहे. त्यामुळे अजंताला निवड समितीचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी करून दाखवावी लागेल. भारताची गोलंदाजीची स्थिती मात्र नाजूक बनली आहे. झहीर खान दौऱ्याआधीच जखमी झाला, तर एस. श्रीशांत याला मायदेशी परतावे लागत आहे. यातच हरभजनसिंगला ताप आला आहे.
अध्यक्षीय संघात कसोटी संघातील सहा खेळाडू आहेत. दिलहारा फर्नांडो, चनाका वेलेगेदारा आणि अजंता हे त्यांचे प्रमुख गोलंदाज आहेत. भारतीय संघात सहाव्या फलंदाजासाठी शर्यत आहे. युवराजसिंग, सुरेश रैना आणि एम. विजय यांना संधी मिळू शकते. यातील सर्वोत्तम खेळी करणाऱ्याचे पारडे जड होईल.
भारतीय गोलंदाजीत इशांत शर्माच्या जोडीला अभिमन्यू मिथुन याला संधी मिळू शकते. त्यासाठी मिथुन याला थीलन समरवीरा, उपूल थरांगा आणि लाहिरू थिरीमन्ने यांच्याविरुद्ध भेदक मारा करावा लागेल. अर्थात, बदली खेळाडू मुनाफ पटेल याच्यावरही गोलंदाजीचे स्वरूप अवलंबून असेल. हरभजनचा जोडीदार म्हणून अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांना संधी आहे, पण दोघांपैकी एकालाही निर्णायक प्रभाव पाडता आलेला नाही. हरभजनने येथे आल्यापासून अद्याप सरावही केलेला नाही. त्यामुळे सराव सामन्यात हे दोघे खेळू शकतील.