दलित न्यायापासून वंचितच
-
Thursday, July 15, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - खैरलांजी येथील दलित कुटुंबाच्या क्रूर हत्याकांडातील आरोपींना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशीऐवजी आज जन्मठेपीची शिक्षा सुनावल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांसह दलित संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी अत्याचारग्रस्त कुटुंबासह दलित व पुरोगामी संघटनांकडून यापूर्वी करण्यात आली होती. मात्र आज नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने नाराजी उमटली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रिपब्लिकन व परिवर्तनवादी चळवळीला धक्का बसला आहे. आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयातही कायम राहील ही अपेक्षा फोल ठरली, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे निमंत्रक माजी खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपण सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे अध्यक्ष टी. एम. कांबळे यांनी खैरलांजी प्रकरणी सरकार व सीबीआय तपास करण्यात कुचकामी ठरल्याने फाशीची शिक्षा रद्द झाल्याचा आरोप केला आहे. या निर्णयामुळे जातीयवादाला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आरोपींची फाशी रद्द झाल्याने दलित न्यायापासून वंचित राहिल्याची प्रतिक्रिया भारतीय दलित पॅंथरचे नेते दयाल बहाद्दूरे यांनी व्यक्त केली आहे.