नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू बाभळी धरणाच्या मुद्याचा राजकीय लाभ उठवू इच्छित आहेत, अशी टीका आंध्र कॉंग्रेसचे प्रभारी सरचिटणीस व कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी आज येथे केली. पत्रकारांबरोबरच्या वार्तालापात त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबतही मतप्रदर्शनास नकार दिला.
बाभळी धरणाबाबत नायडू यांची यात्रा व स्वतःला अटक करवून घेण्याबद्दल मोईली म्हणाले, की आंध्रासाठी व तेथील कॉंग्रेससह सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने बाभळी धरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी आंध्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी 23 जुलैचा दिवस तात्पुरता निश्चितही करण्यात आला होता. या संदर्भात रोसय्या स्वतः नायडू यांच्याशी बोलले होते. परंतु, त्याची वाट न पाहता नायडू यांनी परस्पर यात्रा काढून स्वतःला अटक करवून घेत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेलंगणा विभागात बारा जागांसाठी पोटनिवडणुका असल्याने त्यांची कृती ही शुद्ध राजकीय हेतूने आहे हे कोणाच्याही लक्षात येईल.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा नव्याने तोंड फुटले आहे. बेळगावसह कर्नाटकातील 835 मराठी भाषिक गावे या वादाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित करावीत, अशी मागणी महाराष्ट्रातर्फे करण्यात आली आहे. त्या संदर्भात विचारणा केली असता मोईली यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्याबाबत मतप्रदर्शन करणे उचित होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter