राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी अर्धवटच
-
Thursday, July 22, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली स्टेडियम अजून अर्धवट अवस्थेतच आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 1 ऑगस्ट रोजी सर्व स्टेडियम संयोजन समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. मात्र, सध्याच्या चित्रावरून अर्धवट अवस्थेतच मैदाने संयोजन समितीकडे सुपर्द करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
केवळ स्टेडियमच नाही, तर क्रीडा ग्राम आणि अन्य सुविधाही अर्धवट अवस्थेत आहेत. संयोजन समितीकडे सुपूर्द करण्याचा मुहूर्त साधून त्यानंतरही मैदाने पूर्ण करण्याचे काम सुरू ठेवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
स्टेडियमच्या उभारणीचे काम सीपीडब्ल्यूडी आणि डीडीए यांच्याकडे सोपविण्यात आले होती. या दोन्ही कंपन्यांनी कामास वेळ लागत असल्याचे मान्य केले असले तरी अहोरात्र काम करून 1 ऑगस्टपूर्वी ती पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यातूनही काही कामे अर्धवट राहिल्यास ती 1 ऑगस्टनंतर पूर्ण करण्यात येतील, असेही या सूत्राने सांगितले.
या संदर्भात संयोजन समितीचे प्रवक्ते ललित भानोत यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, तेदेखील कामाच्या प्रगतीवर नाराजी व्यक्त केल्याचे या सूत्राने स्पष्ट केले.