कागदी पास बंद, वशिल्याने दर्शन मात्र चालूच
-
Thursday, July 22, 2010 AT 12:30 AM (IST)
पंढरपूर - आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यंदा कोणालाही वशिल्याने सोडायचे नाही आणि व्ही. आय. पी. म्हणून दिले जाणारे दर्शन पासही द्यायचे नाहीत, असा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र लाखो लोक रांगेत उभे असताना मंदिर समितीचे पदाधिकारी, पोलिस आणि अन्य काही संबंधितांच्या मदतीने दिवसभर अनेकांनी वशिल्याने दर्शन घेतले. त्यामुळे प्रत्यक्षात कागदी पास नाहीत परंतु वशिल्याने दर्शन मात्र चालूच अशी आजची स्थिती होती. गोरगरीब वारकऱ्यांना दर्शनासाठी तब्बल 48 तासांहून अधिक काळ रांगेत उभा राहावे लागत होते.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी दर्शनाच्या रांगेत उभे असताना दुसरीकडे मात्र शेकडो लोक श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीकडून व्ही. आय. पी. दर्शन पास मिळवून पाच मिनिटात दर्शन मिळवतात. त्यामुळे गोरगरीब वारकऱ्यांवर अन्याय करणारी ही दर्शन पास पद्धत बंद करा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती. "सकाळ'ने या संदर्भात पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन यंदा दिंडीकरी, फडकरी अशा मानकऱ्यांना वगळता अन्य कोणालाही पास द्यायचे नाहीत, असा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्यामुळे वशिल्याने पास मिळवून दर्शन घेणाऱ्यांना यंदा दर्शन घेता येणार नाही असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात मंदिर परिसरात पाहणी केली असता संत तुकाराम भवनातून तसेच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने वशिल्याने अनेकांना दर्शनाला सोडण्यात येत असल्याचे दिसले. समितीच्या कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव अशा मंडळींना सोडणे भाग पडत होते. पास असताना अधिकृतपणे ही मंडळी जात होती. आज मात्र थोडा थोडा वेळ थांबून अशा मंडळींना मंदिरात सोडण्यात येत होते. श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच मंदिराशी संबंधित काही मंडळी लोकांना वशिल्याने सोडण्यासाठी धावपळ करीत होते. याचा परिणाम दर्शनाच्या रांगेवर झाला. मध्ये घुसणाऱ्या मंडळींमुळे रांग आज वेगाने पुढे सरकत नव्हती.
आज मंदिराच्या पश्चिमद्वारातून बाहेर आलेले शंकराम नरहरी शिंदे (रा. कावळ्याची वाडी, ता. परळी) म्हणाले, ""आम्ही सोमवारी दुपारी बारा वाजता दर्शनाच्या रांगेत उभे होतो. तब्बल 48 तासांनंतर आज दुपारी 12 वाजता त्यांना दर्शन मिळाले. दर्शन रांगेत अनेक ठिकाणी वारकरी मधेच घुसत होते असे त्यांनी सांगितले.'' अन्य तीन, चार वारकऱ्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला लगेचच दर्शन झाले, आम्ही ओळखीने गेलो होतो असे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले. आज दुपारी बराच वेळ मंदिर परिसरात थांबून पाहणी केली असता मंदिरातून बाहेर येणाऱ्या लोकांचा वेग खूपच कमी होता आणि दुसरीकडे वशिल्याने अनेक जण दर्शनाला जात असल्याचे चित्र दिसले.
दुसरीकडे हजारो वारकरी नामदेव पायरीचे किंवा मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन तृप्त होत होते. घाटनांदूर (ता.आंबाजोगाई) येथून आलेले उमाकांत पुरी महाराज म्हणाले, ""पायी दिंडीसोबत आल्याने पाय दुखत आहेत. आता चाळीस ,पंचेचाळीस तास रांगेत उभा राहणे शक्य नाही. त्यामुळे नामदेव पायरीचे दर्शन घेतले आणि समाधान झाले.
एकंदरीतच आषाढी एकादशी दिवशी पास मिळवून "शॉर्टकट'ने दर्शन मिळवणाऱ्या लोकांनी यंदादेखील अवघ्या काही मिनिटांत दर्शन मिळवले. तासन्तास रांगेत उभारणारे मात्र रांगेतच उभे राहिले.