कोल्हापूर(प्रतिनिधी) - काहीशा मंदावलेल्या पावसाने काल(बुधवार) सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार बरसायला सुरवात केली आहे. काल दुपारपर्यंत जिल्ह्यात शिरोळ तालुका वगळता अन्य तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरु होता. पुन्हा पाऊस वाढल्याने आज(गुरुवार)सकाळपर्यंत राधानगरी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याचे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरी धरण 90 टक्के भरले होते. सकाळपासून धरणक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाल्याने चोवीस तासात धरण भरु शकते असे प्रशासनाच्या सुत्रांनी संगितले. सोमवारी (ता.26) सायंकाळपासून पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. पण पाऊस पूर्णपणे ओसरला नव्हता. काल(बुधवारी) पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणांत ऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे. दोन दिवस पाऊस राहिल्यास तुळशी धरण वगळता अन्य सर्व धरणे काठोकाठ भरतील अशी शक्यता आहे. तुळशी धरणातील पाणी उन्हाळ्यात डागडुजीसाठी सोडण्यात आल्याने हे धरण भरण्यास काहीसा वेळ लागेल अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धरणे भरल्यानंतर पाऊस सलग राहिल्यास व धरणांतूनही पाणी सोडायची वेळ आल्यास मात्र जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होवू शकते असे पूरनियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. अद्याप धरणांतून फारसे पाणी सोडण्यात येत नसल्याने नद्यांची पातळी धीम्या गतीने वाढत आहे. काल(बुधवारी)दुपारी एक वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पातळी 41.10 फूट इतकी होती. धोक्याची पातळी 43 फूट इतकी आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर 42 रस्ते वाहतुकीस बंद आहेत. जिल्ह्यातील पाण्याखालील गेलेले बंधारे पुढीलप्रमाणे आहेत. या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने सुरु आहे.
बुधवारी(ता.28) आठ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार धरणांची पाणीसाठ्यांची टक्केवारी अशीराधानगरी - 90, तुळशी - 26, वारणा - 79, दुधगंगा - 66, कासारी - 93, कडवी-86, कुंभी-69, पाटगाव-86, चिकोत्रा - 35, चित्री - 70, जंगमहट्टी - 49 घटप्रभा-87, कोदे-100
Follow
Us on
Twitter