
मुंबई - स्थळ मंत्रालय... वेळ दुपारी 1 वाजताची... लाल दिव्याची गाडी घेऊन मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील सुसाट वेगाने निघतात... सोबत महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारी... अधिकाऱ्यांना काहीच सुचत नसते... गाडी मंत्रालयाबाहेर पडता क्षणीच एका खड्ड्यात दाणकन आदळते... अधिकाऱ्यांच्या तोंडून सावकाश असा अगदी अदबीने आवाज येतो... तर जयंतराव हसत हसत म्हणतात एक... असे करत करत गाडी एकही खड्डा न चुकवता.. एक.. दोन.. तीन.. अशा कित्येक खड्ड्यांतून धावत असते... प्रत्येक खड्ड्याच्या दणक्याने मणक्याला इजा होण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांना सतावत असते... चित्रपटातल्या प्रसंगाला साजेसा हा प्रसंग आज पालकमंत्री जयंत पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना दाखवून दिला.
मुंबईतल्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची जयंतरावांनी पालिका अधिकाऱ्यांना आज प्रत्यक्ष झलकच दाखवून दिली.
त्यांनी मंत्रालयात मुंबईच्या समस्यांबाबत बैठक बोलावली होती. मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव यावर महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर जयंतरावांची गाडी रस्त्यावरील खड्ड्यांकडे वळली. नेहमीप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांची माहिती देत, सर्व काही सुरळीत असल्याचा दावा अगदी सहजपणे केला; मात्र जयंतरावांना तो पटला नाही. बैठकीतून उठत त्यांनी अधिकाऱ्यांना सोबत येण्याची विनंती केली. मंत्रालयाच्या पायऱ्यावर आल्यानंतर, त्यांनी ड्रायव्हरला खाली उतरण्यास सांगितले. पालिकेतील अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, आशीषकुमार सिंग व आसिमदास गुप्ता या अधिकाऱ्यांना लाल दिव्याच्या गाडीत घेऊन जयंतरावांनी मरीन ड्राईव्ह रस्त्यावरून अधिकाऱ्यांना "खड्डा सफर' घडविली. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक खड्ड्यात मुद्दाम गाडी घालत, अधिकाऱ्यांना खड्डयांची गंभीरता त्यांनी दाखवून दिली. मंत्रिमहोदयांचा हा पवित्रा पालिका अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आणि साहेब आम्हाला रस्त्यातील खड्डे कळले हो, आता दुसऱ्या खड्ड्यात गाडी घालू नका, अशी विनंती अधिकाऱ्यांनी जयंतरावांना केली.
मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी रस्त्यावरील खड्ड्यातून धावताना, परदेशातील रस्ते कसे गुळगुळीत असतात याचे किस्सेही जयंतरावांनी अधिकाऱ्यांना ऐकवले. महापालिकेने 30 कोटी रुपयांचा निधी खड्डे बुजविण्यास दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील 18 कोटी रुपये खर्चही झाले, असे सांगताच जयंतरावांची गाडी पुढच्या भल्या मोठ्या खड्ड्यातून गेली. यामुळे 18 कोटी खर्चून कुठले खड्डे बुजवले, या जयंतराव यांच्या खोल प्रश्नाला मणक्याला दणका बसलेल्या अधिकाऱ्यांकडे उत्तरच नव्हते.
Follow
Us on
Twitter