नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मैदाने उभारण्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारांशी संयोजन समितीचा काहीच संबंध नाही, असे सांगून संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय दक्षता समितीने बांधकाम व्यवहारात भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात केलेले आरोप फेटाळून लावले.
कलमाडी म्हणाले, ""आम्हाला मैदानांच्या उभारणीशी काही देणेघेणे नाही. आम्ही उभ्या करण्यात आलेल्या मैदानांचा ताबा स्वीकारणार आहोत. या मैदानांवर ज्या भागात क्रीडाप्रकार होतील, त्या भागाशीच आमचा संबंध आहे. मग, मैदाने कशी उभारली गेली, त्यात गैरव्यवहार झाला का? हा विषय आमच्या अखत्यारीतील नाही.''
"सीव्हीसी'ने दिलेल्या अहवालात मैदानांच्या उभारणीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविषयी कलमाडी म्हणाले, ""त्यांनी केलेले आरोप गंभीर प्रकारचे आहेत. आम्ही त्यात निश्चितपणे लक्ष घालू. त्यांच्या कामाचा परिणाम देशात होणाऱ्या क्रीडा स्पर्धेवर होणार असेल, तर आम्हीच सर्वप्रथम त्यांना जाब विचारू. संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून स्पर्धा यशस्वी करणे, हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.''
Follow
Us on
Twitter