नवी दिल्ली - महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत पोचल्यानंतर तोंड उघडत नाहीत, असा शेरा मारताना यापुढे कदाचित विचार करावा लागेल. पंधराव्या लोकसभेच्या गेल्या वर्षभराच्या काळात अधिवेशनाच्या दरम्यान सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार महाराष्ट्राचेच ठरले आहेत. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सर्वाधिक 326, तर त्याखालोखाल भाजपचे खासदार हंसराज अहीर यांनी 310 प्रश्न संसदेत उपस्थित केले; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या 288 प्रश्न विचारून पाचव्या क्रमांकावर आहेत. या सदस्यांनी लोकसभेत सातत्याने प्रश्न विचारून राज्यातील आणि आपापल्या मतदारसंघातील प्रश्न धसास लावले आहेत.
निवडून दिलेल्या खासदारांनी गेल्या वर्षभरात संसदेत जाऊन नेमके काय केले, त्याचे एक वर्षाचे प्रगतिपुस्तकच "व्होट फॉर इंडिया' या संस्थेने आज प्रसिद्ध केले. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या संसद सदस्यांसोबतच सभागृहातील चर्चेत अजिबात सहभागी न होणाऱ्या "मौनी' खासदारांची यादीही या प्रगतिपुस्तकासोबत आहे. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींसह डॉ. पद्मसिंह पाटील, बळिराम जाधव, सुरेश टावरे आणि नीलेश राणे यांचे मागील वर्षभरात तोंडावर बोट असून, कोणत्याही चर्चेत त्यांनी अजिबात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवलेले नाही, असा "व्होट फॉर इंडिया'चा निष्कर्ष आहे.
खासदारांच्या कामगिरीचे हे मूल्यमापन सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्या वर्षभराचेच आहे. एवढ्या कमी कालावधीत त्यांच्या कामाविषयी निष्कर्ष काढणे कठीण असले, तरी खासदारांवर त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातच मतदारसंघाचा दबाव कायम राहावा, या विचाराने "व्होट फॉर इंडिया'ने हे प्रगतिपुस्तक प्रसिद्ध केले आहे. साधारणतः लोकसभा निवडणुका जवळ आल्या, की पाच वर्षांचा आढावा घेणारी अशाप्रकारची प्रगतिपुस्तक विविध संस्था प्रसिद्ध करतात. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि अशा आढाव्यांचा फारसा उपयोग होत नाही.
दक्षिण मध्य मुंबईचे खासदार एकनाथ गायकवाड, मावळचे खासदार गजानन बाबर, शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विलास मुत्तेमवार, हरिश्चंद्र चव्हाण आणि संजीव नाईक यांनीदेखील दीडशेपेक्षा अधिक प्रश्न विचारले आहेत; तर यांच्या अगदी उलट शिवसेनेचे सभागृहातील नेते अनंत गिते, माजी राज्यमंत्री माणिकराव गावित आणि सदाशिवराव मंडलिक यांनी मात्र वर्षभराच्या काळात एकही प्रश्न विचारण्याची तसदी घेतलेली नाही.
सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस उलटल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे कामकाज विरोधकांनी गोंधळ घातल्याने होऊ शकलेले नाही. हाच पायंडा गेली वर्षभर सुरू आहे. सभागृहातील वादविवाद निकोप होण्याच्या ऐवजी हुल्लडबाजी आणि गोंधळातच अधिकाधिक वेळ गेल्याचे दिसते. सभागृहातील वादविवादात डाव्या पक्षांनी यशस्वी भाग घेतला असल्याचे या प्रगतिपुस्तकात दिसून येते. वादविवादात मात्र महाराष्ट्र काहीसा पिछाडीवर पडलेला दिसत आहे. हंसराज अहीर, अनंत गिते, विलास मुत्तेमवार, सुप्रिया सुळे, संजय निरुपम आणि गोपीनाथ मुंडे यांनीच संसदेतील चर्चांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आहे.
खासदार निधीचा वापर शून्यनिवडणुका जवळ आल्यावर आपापल्या मतदारसंघांमध्ये राजकारणी भरपूर कामे हाती घेतात. मात्र, पाच वर्षे सातत्याने काम करण्यात त्यांचा अभाव आहे. 2009 ते 2010 या आर्थिक वर्षात खासदारांना निधी खर्च करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळाला. खासदारांना दर वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जातो. या निधीचा शून्य उपयोग करणाऱ्या खासदारांमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचादेखील सहभाग आहे. शिवाय राज्यातील भावना गवळी, डॉ. संजीव नाईक, समीर भुजबळ, सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी आदींचा समावेश आहे; तर केंद्रीय मंत्री असलेल्या मुकुल वासनिक यांनी त्यांच्याकडचा तीन कोटींच्या निधीपैकी केवळ 5 हजार रुपयेच वापरले आहेत, तर आनंदराव अडसूळ यांनी 4 हजार रुपयेच वापरण्याची तसदी घेतली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मात्र राज्यात सर्वाधिक निधी वापरल्याचे "व्होट फॉर इंडिया'च्या प्रगतिपुस्तकावरून दिसते. त्यांना उपलब्ध असलेल्या 1 कोटी 54 लाख रुपयांपैकी एक कोटी 46 लाख रुपयांचा त्यांनी वापर केला आहे.
Follow
Us on
Twitter