नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार या वेळी अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिला जाहीर झाला आहे.
पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन आणि ध्यानचंद) समितीची आज येथे बैठक होऊन त्यामध्ये साईनाची निवड करण्यात आली. गेल्या वर्षभरात साईनाने बॅडमिंटन कोर्टवर अद्वितीय कामगिरी केली आहे. प्रत्येक स्पर्धेगणिक चमकदार कामगिरी करणारी साईना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू असून, तिने जून महिन्यात सलग तीन सुपर सिरीज विजेतीपदे पटकावली होती. त्याआधी मार्चमध्ये तिने ऑल इंग्लंड सुपर सिरीज स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रीय क्रीडा दिनी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते होणार असून, साडेसात लाख रुपये, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारामुळे अतिशय आनंदित झालेल्या साईनाने "अविश्वसनीय' या शब्दातच आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, ""एक वर्षभरात दुसरा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने माझी स्वप्नपूर्ती झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार आणि तोही राजीव गांधी खेलरत्नसारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने तुम्हाला फार मोठी प्रेरणा मिळते. देशासाठी आणखी मोठे यश मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार स्फूर्तिदायी आहे.''
ती पुढे म्हणाली, ""गेल्या दोन वर्षांत मी चांगली कामगिरी केली. अलीकडेच मी तीन विजेतीपदे मिळविली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. सध्या मी जागतिक स्पर्धेसाठी तयारी करीत आहे आणि त्यातही मला विजेतेपद मिळेल, अशी आशा आहे.''
गेल्या वर्षी साईनाला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. नुकतीच तिची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची ब्रॅंड ऍम्बॅसिडर म्हणून निवड झालेली आहे. नवी दिल्लीत 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण सहा ब्रॅंड ऍम्बॅसिडर निवडण्यात आलेले आहेत.
साईनाचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी, तिने घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ""ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. या पुरस्कारासाठी तीच योग्य खेळाडू होती. गेली दोन वर्षे तिने खूपच चमकदार कामगिरी केली असून, इथूनपुढेही ती यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल, याबद्दल मला विश्वास आहे.''
"पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेत साईनाची खरी कसोटी लागणार असून, ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर जाणार की नाही, हे या स्पर्धेतील कामगिरीवरून ठरणार आहे. सध्या ती दुसऱ्या क्रमांकावर असून, जागतिक स्पर्धेवरच तिचे अव्वल स्थान अवलंबून आहे. कारण, दुर्दैवाने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी क्रमवारीसाठी विचारात घेतली जात नाही,'' असेही गोपीचंद म्हणाले.
गेल्या वर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार ऑलिंपिक बॉंझपदक विजेते विजेंदरसिंग (मुष्टियुद्ध), सुशीलकुमार (कुस्ती) आणि चार वेळची महिला जागतिक मुष्टियुद्ध विजेती मेरी कोम यांना संयुक्तपणे देण्यात आला होता.
अर्जुन पुरस्कारासाठी शिफारशी
हॉकीपटू संदीपसिंग, महिला क्रिकेट कर्णधार झूलन गोस्वामी आणि मुष्टियोद्धा दिनेश कुमार यांच्यासह पंधरा खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार या शिफारशी आता केंद्रीय क्रीडा खात्याकडे सादर करेल आणि त्यानंतर अधिकृतपणे विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. सर्वसाधारणतः निवड समितीने सादर केलेल्या नावांना मान्यता दिली जाते, परंतु क्रीडा खाते त्यामध्ये थोडेफार बदल करू शकते.
भारतीय हॉकी संघाच्या नुकत्याच झालेल्या युरोप दौऱ्यात संदीपसिंगने चांगली कामगिरी केली होती, तर झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला क्रमवारीत गोलंदाजीमध्ये आघाडीवर आहे.
पुरस्कारार्थींमध्ये महिला हॉकीपटू जसजित कौर हिचेही नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारशे मीटर अडथळा शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर जोसेफ अब्राहम आणि थाळीफेकमधील कृष्णा पुनिया यांचीही पुरस्कारसाठी शिफरास करण्यात आली आहे. याशिवाय परिमार्जन नेगी (बुद्धिबळ), राजीव तोमर (कुस्ती) रेहान पोंचा (जलतरण), सुनील छेत्री दीपक मोंडोल (फुटबॉल), संजीव राजपूत (नेमबाजी), दिनेश कुमार (कबड्डी) आणि पॅरा ऑलिंपियन जगसीरसिंग यांची शिफारस केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Follow
Us on
Twitter