पाऊस थांबेपर्यंत कोकण रेल्वे "बंद'
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 31, 2010 AT 12:30 AM (IST)
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील असोडे येथे आज पावसामुळे 80 मीटरची संरक्षक भिंत कोसळून मातीखाली गाडली गेली आहे. त्यामुळे सायंकाळी कोकण रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. हा मार्ग सुरळीत होण्यासाठी किती काळ लागेल? हे सध्या सांगणे अशक्य असल्याचे कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर. नागदत्त यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. नागदत्त यांनी काल (ता. 29) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शुक्रवारी (ता. 30) सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा केला होता. त्याला चोवीस तास होतात तोच त्यांनी असोडे येथे संरक्षक भिंत खाली आल्याने वाहतूक सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत कोकण रेल्वेची परिस्थिती "जैसे थे'च राहणार आहे.
ते म्हणाले, ""रत्नागिरी ते विलवडे मार्गावरील पोमेंडी, निवसर आणि असोडे येथील काम सुरू आहे. पावसामुळे अडथळा निर्माण होत आहे. आज सायंकाळपर्यंत रेल्वे सुरू होईल, असा आमचा अंदाज होता. पोमेंडीत 6 पोकलॅन, 4 डंपरद्वारे काम सुरू आहे, तर असोडे येथे 12 पोकलॅनद्वारे युद्धपातळीवर माती काढण्याचे काम सुरू होते. काल रात्री माती काढत असताना येथील संरक्षक भिंतही कोसळली. या भागामध्ये जोरदार पाऊस होता. कोसळलेली भिंत काढण्यासाठी बराच कालावधी लागेल. त्यामुळे वाहतूक कधी सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे. पोमेंडी येथील संरक्षक भिंत कापून काढली जाणार आहे. डोंगरावरची चिखलाची माती ट्रॅकवर येत आहे.
रत्नागिरी-विलवडेदरम्यान तिन्ही ठिकाणी जवळपास 400 कर्मचारी चोवीस तास काम करीत आहेत. नऊ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चार गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. नेत्रावती आणि मंगला या दोन रेल्वे गाड्यांमधल्या प्रवाशांची एसटीमधून अदलाबदल केली जाणार आहे. आतापर्यंत कोकण रेल्वेच्या 30 फेऱ्यांमधील 30 हजार प्रवाशांची अदलाबदल केली गेल्याचे श्री. नागदत्त यांनी स्पष्ट केले.
* रेल्वे सुरळीत करण्याचा दावा फोल
* रेल्वे सुरू होण्याबाबत अधिकारी अनुत्तरित
* माती काढण्याचे काम युद्धपातळीवर