धोनीची खेळपट्टीवर खरमरीत टीका
पीटीआय
Saturday, July 31, 2010 AT 12:00 AM (IST)
कोलबो - भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दुसऱ्या क्रिकेट कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर खरमरीत टीका केली आहे. ही कसोटी चौथ्या दिवशीच सोडून देणे आपण पसंद केले असते, या शब्दांत त्याने खेळपट्टीबद्दलची नाराजी व्यक्त केली. टीका करताना त्याने कोणतेही शब्द बाकी ठेवले नाहीत.
पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ""अशा प्रकारच्या खेळपट्टीवर 99.9 टक्के वेळा सामन्याचा निकाल लागू शकणार नाही. खेळपट्टी स्पोर्टिंग असावी, असे बोलले जात आहे. कुणा तरी एकाला अनुकूल असणे याला स्पोर्टिंग खेळपट्टी म्हणत नाही.''
सामना एक दिवस आधी संपायला पाहिजे होता का, असे विचारता धोनीने, अशी कुणी सूचना केली असती तर त्याला मी आक्षेप घेतला नसता, अशा उपरोधिक शब्दांत उत्तर दिले. ""सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता नसल्याने तो आधी संपविला असता तर एक दिवसाची जादा विश्रांती घेणे आपल्याला आवडले असते,'' असे तो म्हणाला.
"शेवटच्या दिवशी काहीही घडण्याची शक्यता नव्हती. अशा वेळी सामना संपविला असता तर छानपैकी मेजवानीचा आस्वाद घेता आला असता आणि विश्रांतीही मिळाली असती,'' असेही धोनी म्हणाला.