वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या येत्या नोव्हेंबरमधील भारत दौ-यामुळे, उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवीन परिमाण लाभणार आहे. एकत्र काम करताना जागतिक आव्हानांना सामोरे जाऊन, तोडगा कसा काढावा याचे प्रात्यक्षिकही या दौ-यामुळे दाखविता येणार आहे, असे भारताच्या अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर यांनी येथे सांगितले.
अमेरिकेतील प्रकल्पांमध्ये वापरलेल्या आण्विक इंधनावर पुनःप्रक्रिया करण्याच्या करारावर भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींनी सह्या केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. अमेरिकेच्या राजकीय व्यवहार खात्याचे उपमंत्री बिल बर्न्स यांनी अमेरिकेतर्फे या करारावर सही केली. भारत आणि अमेरिका यांच्यातील आण्विक कराराच्या अंमलबजावणीतील हा शेवटचा टप्पा होता.
आज झालेला करार आणि काही दिवसांपूर्वी दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचेच निदर्शक आहेत. गेल्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये व्यूहात्मक चर्चा झाली आणि त्यापाठोपाठ विविध पातळ्यांवरील अधिका-यांच्या बैठकाही झाल्या, असे मीरा शंकर यांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter