मुंबई - राज्यात नवीन 74 व्यावसायिक पदवी महाविद्यालयांना सरकारने चालू शैक्षणिक परवानगी दिली आहे. नवी व्यावसायिक महाविद्यालये, नवीन तुकड्या, अभ्यासक्रम, शाखा या माध्यमातून आणि अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंटची नवी महाविद्यालये आदींच्या माध्यमातून राज्यात पदवीच्या सुमारे 60 हजारांहून अधिक जागा यंदाच्या वर्षी अतिरिक्त उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी "सकाळ'ला सांगितले.
नवीन व्यावसायिक महाविद्यालयांपैकी मुंबई विद्यापीठ क्षेत्रात 26 महाविद्यालये, पुणे विद्यापीठ क्षेत्रात सहा, एसएनडीटी विद्यापीठ क्षेत्रात 4 महाविद्यालये आहेत. बीएस्सी कॉम्प्युटर, आयटी, फायनान्शियल मॅनेजमेंट आदी विविध अभ्यासक्रमांची ही पदवी महाविद्यालये आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये अतिरिक्त तुकड्या, विद्याशाखा, अभ्यासक्रम यांना 15 जुलै रोजी मान्यता देण्यात आली. यातून सुमारे 25 हजारांहून अधिक जागा पदवी अभ्यासक्रमासाठी वाढल्या. अभियांत्रिकी पदवी, व्यवस्थापन, फार्मसी आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या नवीन महाविद्यालयांना एआयसीटीईने मान्यता दिल्याने सुमारे 20 हजार अतिरिक्त जागांची भर पडली आहे. नवीन व्यावसायिक महाविद्यालयांमुळे आठ ते दहा हजार जागा वाढणार आहेत. अभियांत्रिकी पदविकाच्या जागाही वाढविण्यात आल्या आहेत. बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना यामुळे राज्यात 60 हजारांहून अधिक जागा अतिरिक्त उपलब्ध होणार आहेत. परिणामी यंदा राज्यात पदवी प्रवेशाची कोणतीही अडचण येणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या नवीन पदवी महाविद्यालयांना मंजुरी देण्यास मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नकार दिला आहे. या अभ्यासक्रमांच्या 100 महाविद्यालयांचे प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजूर करून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविले होते; पण त्यांनी त्यास हिरवा कंदील न दाखविल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना मान्यता मिळण्याची शक्यता नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter