
मुंबई - मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजून राज्य सरकारने कापून खायचे ठरविले आहे. सरकार 'एफएसआय' वाढवून कोट्यवधी रुपये कमवीत आहे. मात्र, सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मलेरिया निर्मूलनविषयक आवश्यक उपाययोजना न करणाऱ्या बिल्डरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शाखाप्रमुखांना दिले आहेत.
मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात आज महापौरांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. महापौर श्रद्धा जाधव, आमदार दीपक सावंत, सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, आरोग्य समितीच्या अध्यक्ष अश्विनी मते, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीषकुमार सिंह, मनीषा म्हैसकर, असीम गुप्ता, संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ. संजय ओक आदी या बैठकीला उपस्थित होते.
मुंबईत मलेरियाचे प्रमाण वाढत असून, या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मलेरियाच्या निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेला आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या पाण्याच्या टाक्या तपासाव्यात, बांधकामांच्या ठिकाणी मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बिल्डरांना बंधनकारक करावे, नगरसेवकांनी आपापल्या विभागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
Follow
Us on
Twitter