डॉ. श्री बालाजी तांबे
स्त्री - पुरुषांची प्रकृती उत्तम असली तरी सुद्धा परमेश्वरी कृपा असल्याशिवाय संतानयोग सफल होऊ शकत नाही. परेमश्वरी आशीर्वाद ह्या संकल्पनेत एकूणच निसर्गशक्ती, बाह्य वातावरण किंवा पूर्वजन्मातील कर्म ह्या गोष्टींचा समावेश असतो. परेमश्वर म्हणजे कोणी तरी एक मनुष्य व तो कृपा करेल असे नसते तर ती एक संकल्पना असते आणि परमेश्वराची कृपा असली तरच संतानयोग सिद्ध होतो.
कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. एकूण काय तर देवकीला आठ पुत्र होतील असा संतानयोग आधीच माहिती होता. पूर्वीच्या काळी "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' वगैरे आशीर्वाद दिले जात असत त्यात आठ अपत्ये होतील असा आशीर्वाद दिला जात असे. अर्थात श्रीकृष्णांसारखा लोककल्याणकारी पुत्र किंवा कन्या जन्माला आली तर संतानयोग सिद्ध आला असे म्हणायचे.
शेवटी योग शब्द आल्याने असे लक्षात येते की बऱ्याच गोष्टी आपल्या हातात असल्या तरी ज्याच्या बरोबर संयोग झाल्यामुळे किंवा ज्याच्याशिवाय कार्य सफल होणार नाही अशी एक कुठली तरी बाजू परमेश्वरी सत्तेवर अवलंबून असते. ध्यानयोग म्हटले तर मांडी घालून बसणे, डोळे मिटून विशिष्ट मुद्रेत बसणे वगैरे सर्व आपल्या हातात असले तरी ध्यान लागेल की नाही हे निश्चित नसते. कारण ध्यान लागण्यासाठी म्हणजेच ध्यानाचा योग येण्यासाठी अदृश्य शक्तीचाही हात आवश्यक असतो.
संतानयोगाचेही असेच आहे. सर्व ठीक असले तरी सुद्धा परमेश्वरी कृपा असल्याशिवाय हा योग सफल होऊ शकत नाही. परमेश्वरी आशीर्वाद ह्या संकल्पनेत एकूणच निसर्गशक्ती, बाह्य वातावरण किंवा पूर्वजन्मातील कर्म ह्या गोष्टींचा समावेश असतो. परमेश्वर म्हणजे कोणी तरी एक मनुष्य व तो कृपा करेल असे नसते तर ती एक संकल्पना असते आणि परमेश्वराची कृपा असली तरच संतानयोग सिद्ध होतो. त्यामुळेच "देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार' अशा तऱ्हेचे भाकीत करणे याला महत्त्व येते. ही क्रिया मनुष्याच्या हातात असती तर असे भाकीत करण्याला फारसे महत्त्व आले नसते.
बऱ्याच केसेस दवाखान्यात येतात. पती व पत्नी दोघांचे सर्व वैद्यकीय अहवाल ठीक असतात, पुरुष वा स्त्रीत काहीही दोष नसतो. पण संतानयोग मात्र येत नाही. लग्न होऊन 10-15 वर्षे झाली तरी संतान मात्र होत नाही. संतान व्हावे म्हणून सर्व प्रयत्न करणाऱ्यांना मूल होत नाही असे काही ठिकाणी दिसते, तर काही ठिकाणी संतान होऊ नये असे काही विशिष्ट कारणाने वाटत असेल, तेव्हा नेमके दिवस जातात असेही दिसते.
बऱ्याच वेळा स्त्री वा पुरुषात काही दोष असतात, ते दोष दूर केल्याने संतानप्राप्ती सुलभ होऊ शकते. विज्ञानाने केलेल्या प्रगतीने स्त्री-पुरुषांच्या म्हणजे बीजांड व शुक्राणू यांचे बाहेर मीलन घडवून आणून संतानयोग घडवून आणता येतो. बऱ्याच वेळा गर्भाशयात रेत स्थापित करून योग घडवून आणता येतो. काही विकारांना संतुलित करण्यासाठी हॉमोन्सचे उपचार करूनही संतानयोग आणता येतो. हे सर्व खरे असले तरी हे सर्व करून सुद्धा दांपत्य अगदी विषादयोगापर्यंत पोचून त्यांचे मन वेडे पिसे होते, पण संतानयोग येत नाही, असेही घडताना दिसते.
म्हणूनच संतानयोगासाठी परमेश्वराची करुणा भाकावीच लागेल. संतानयोग सहज प्राप्त व्हावा यासाठी मुळात स्त्री-पुरुषांची जननांगे पूर्ण विकसित झालेली पाहिजेत. ज्या वयात पुुरुष-संबंध येऊ नये अशा कोवळ्या वयात संबंध सुरू झाला तर नंतर पुढे अपत्य व्हावे असे वाटते, तेव्हा ते होईलच असे सांगता येत नाही. कारण पूर्वीच्या चुकीच्या वागण्याच्या कारणामुळे अपत्यप्राप्तीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेत बिघाड झालेला असू शकतो.
स्त्रीचा मासिक धर्म व्यवस्थित व आरामदायक ठरला नाही तर त्यात होणाऱ्या बिघाडामुळे पाळीची अनियमितता, शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, बीजांडवाहिन्यांमध्ये अवरोध उत्पन्न होणे, गर्भाशयाच्या आत किंवा गर्भाशयाच्या बाहेर गाठी तयार होणे, बीजकोषावर सिस्ट तयार होणे वगैरे त्रास सुरू होतात व संतानयोग येणे अवघड होऊन बसते.
पुरुषांच्या बाबतीत तारुण्यात येताना तारुण्यसुलभतेमुळे वीर्यपतनाच्या अतिरेकामुळे झालेल्या चुका संतानप्राप्तीसाठी अडचण ठरविणाऱ्या असू शकतात. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या संकल्पनेप्रमाणे स्त्री-पुरुषांनी शरीरशुद्धी करून स्वतःच्या शरीरातील धातू, त्यातल्या त्यात वीर्यधातू पूर्णत्वाला नेऊन, वीर्यधातू बलवान करून; स्त्रीच्या बाबतीत महिन्याच्या महिन्याला तयार होणाऱ्या बीजांडाची शुद्धी व ताकद व्यवस्थित असावी तसेच पुरुषाचे शुक्राणू यांची व्यवस्थित शुद्धी, ताकद व गती व्यवस्थित असावी या दृष्टीने औषधोपचार रसायनसेवन करून नंतर समन्वयातून संतानयोग येण्याची शक्यता खूप वाढते.
स्त्रीचे हॉर्मोनल संतुलन व्यवस्थित होण्यासाठी "स्त्री-संतुलना'सारखे संगीत ऐकणे इष्ट असते. हॉर्मोनल संतुलन व्यवस्थित असल्यास संतानयोग येणे सोपे जाते. शरीरात असलेल्या गुणसूत्रातील दोषामुळे किंवा एका विशिष्ट रोगामुळे उत्पन्न झालेल्या न्यूनतेमुळे, वाडवडिलांच्या परंपरेने आलेल्या दोषामुळे, पूर्वजन्मातील दोषांमुळे वगैरे अनेक कारणांमुळे संतानप्राप्ती अवघड होते. अशा वेळी यदाकदाचित संतानयोग आला तरी अपत्याच्या लिंगाबाबत काही समस्या असू शकते. यासाठी आयुर्वेदाने ग्रहचिकित्सेचा भाग सांगितला. बऱ्याच वेळा सर्व इलाज केल्यावर सुद्धा एखाद्या ठिकाणी संतानयोग येत नाही असेही घडू शकते. स्त्री-पुरुषाचे वय जास्ती असेल तरी संतानयोग यायला अडचण येते. एखादे विशिष्ट कारण घडल्यावर वा एखाद्या सत्पुरुषाचा आशीर्वाद लाभल्यावर संतानयोग आल्याची अनेक उदाहरणे दिसतात.
संतानयोग येण्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद हा एक भाग धरला तरी संतानयोग येण्याआधी प्रत्येक स्त्री-पुरुषाने शरीरशुद्धी, रसायनसेवन, विशिष्ट दिवस, वेळ पाहून गर्भधारणेसाठी प्रयत्न करून संतानयोग येण्याची अपेक्षा ठेवावी. गर्भधारणा झाल्यावर सुद्धा गर्भवतीने पूर्ण गर्भारपणात खाण्या-पिण्याचे नियम, आचरण, हिंडण्या-फिरण्याचे नियम पाळल्यास संतानप्राप्ती सोपी होऊ शकते. अन्यथा दिवस गेले तरी संतानयोग येईलच असे नाही. आहार-आचरणाचे नियम नीट न पाळल्यास गर्भधारणा खंडित होऊन संतानयोग चुकू शकतो.
अर्थात गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, संतान निर्व्यंग असावे, अपत्याने वाढीचे टप्पे जलद पार केलेले दिसावेत, असे अपत्य असले तर खरा संतानयोग म्हणावा, अन्यथा अपत्यप्राप्तीनंतर माता-पित्यांचे आयुष्य अवघड होऊन बसले, तर असा संतानयोग झाला काय न झाला काय सारखेच असे म्हणावे लागेल. माता-पित्यांचे आरोग्य व त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्यास, त्यांची श्रद्धा असल्यासच उत्तम संतानयोगाची अपेक्षा ठेवण्यात येते.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)