डॉ. श्री बालाजी तांबे

मी दहावीत असताना माझ्या हातावर तेल सांडले होते आणि तीन - चार ठिकाणी थोडे थोडे भाजले होते. आता सात वर्षे झाली, तरी तेथे डाग आहेत. एका ठिकाणची त्वचा खडबडीतही झाली आहे. माझा हात पूर्वीसारखा होऊ शकतो का?...तेजश्री
उत्तर - भाजल्यामुळे आलेले डाग अनेक वर्षे राहू शकतात. असे होऊ नये म्हणून भाजल्यामुळे झालेली जखम भरून आल्यावर जितक्या लवकर उपचार घेता येतील तितका चांगला गुण येताना दिसतो. अजूनही डागांवर "रोझ ब्युटी तेला'सारखे रक्तशुद्धिकर द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल जिरविण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळेला अनंत, हळद, वाळा, नागरमोथा वगैरे द्रव्यांनी बनविलेले उटणे लावण्याचाही फायदा होईल.

माझे वय 30 असून माझ्या अंगावरून रोज पांढरा व चिकट स्राव जातो. त्यामुळे पाय-कंबर खूप दुखतात, अशक्तपणाही खूप जाणवतो. कृपया यावर उपाय सुचवावा. सौ. फरांदे, पुणे
उत्तर - दररोज या प्रकारचा स्राव होणे हे स्त्रीच्या एकंदर आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. यावर उत्तम उपाय म्हणजे नियमितपणे "फेमिसॅन तेला'चा पिचू वापरणे व विशिष्ट औषधी द्रव्यांची धुरी घेणे. शतावरी कल्प घालून दूध घेण्याचाही चांगला उपयोग होईल. या उपायांनी गर्भाशयाची व संपूर्ण प्रजननसंस्थेच्या शक्तीची वाढ झाली की स्राव बंद होईल. बरोबरीने अशोक, धायटी, नागकेशर यासारखी औषधे घेण्याचाही उपयोग होईल.

मला अंगावर पित्त उभरण्याचा त्रास आहे. डोके, मान, तळपाय, लघवीच्या ठिकाणी खूप खाज येते. माझे केसही खूप गळतात. मासिक पाळीत दोनच दिवस रक्तस्राव होतो. डोळे-कानातून उष्णता जाणवते. माझे वय 26 वर्षे आहे....अर्चना, अंदरसूल
उत्तर - या सर्व त्रासांचे मूळ पाळीच्या दिवसात कमी रक्तस्राव होण्यात आहे. तरुण वयात कमी रक्तस्राव झाला की जी उष्णता, जी अशुद्धी शरीरात राहते त्यातून या प्रकारचे अनेक त्रास होऊ शकतात. रोज सकाळी ताज्या कोरफडीचा चमचाभर गर घेण्यास सुरुवात करता येईल. कुमारी आसवासारखे, "फेमिनाईन बॅलन्स'सारखे आसव घेण्याचाही फायदा होईल. अतिरिक्त उष्णता कमी व्हावी यासाठी "पित्तशांती गोळ्या' घेण्याचा उपयोग होईल. तेलकट, मिरची, मसाले, गवार, वांगी, फ्लॉवर आहारातून टाळावे. तळपायाला पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल.

किडनीचे प्रत्यारोपण केल्यावरही आयुर्वेदिक औषधे घेता येतात का? प्रत्यारोपणानंतर आहाराचे पथ्य सांभाळणे आवश्यक असते का?...
उत्तर - किडनीचे प्रत्यारोपण केले तरी मूळची किडनी ज्याप्रकारे काम करेनाशी झाली, तसे प्रत्यारोपित किडनीच्या बाबतीत घडू नये यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने आयुर्वेदिक औषधे घेणे व पथ्य पाळणे अतिशय उपयुक्त होय. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे व आहारयोजना करणे सर्वात चांगले, पण तत्पूर्वी पुनर्नवासव, गोक्षुरादि गुग्गुळसारखी औषधे घेता येतील. आहारातून कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गवार, वांगे, राजमा, चवळी, वाटाणे, दही वगैरे टाळणे उत्तम होय.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज,
कार्ला 410 405
www.ayu.de डॉ. श्री बालाजी तांबे यांचा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...
(डॉ. श्री. बालाजी तांबे यांचे सुप्रसिद्ध पुस्तक 'आयुर्वेदिय गर्भसंस्कार' आता ऑनलाईन मिळतेय...!)