किशोरी म्हणतेय, "ऐका दाजिबा'!मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी मालिकांत स्वतःचा ठसा उमटविणारी अभिनेत्री किशोरी शहाणे-विज आता निर्माती बनली आहे. याआधी तिनं "ओमदीमंत्र प्रॉडक्शन' या बॅनरतर्फे "मोहट्याची रेणुका' या चित्रपटाची निर्मिती केली होती. तो अनुभव गाठीशी घेऊन आता "ऑगस्ट" महिन्यात तिचा "ऐका दाजिबा' हा एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत आहे. या चित्रपटात किशोरी शहाणे व अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली चर्चा.किशोरीला या चित्रपटाच्या नावाची एक गंमत सांगायची होती. ती म्हणाली, ""जेव्हा वैशाली सामंत व अवधूत गुप्ते यांचं "ऐका दाजिबा' हे गाणं हिट झालं, तेव्हाच माझे पती दीपक बलराज-विज म्हणाले की, जेव्हा आपण एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती करू, तेव्हा हेच नाव घ्यायचं. "ऐका दाजिबा'. ते स्वप्न प्रत्यक्षात यायला मात्र 2009 साल उजाडलं. चित्रपटाच्या कथेकरिता अशोक पाटोळे यांनी खूप मेहनत घेतली. जवळ जवळ पाच ते सहा महिने आमचं चित्रपटाच्या कथेवर काम चालू होतं. खूप चर्चा, गप्पा यातून खरोखरच अशोक पाटोळे यांनी उत्तम कथा लिहिली आहे.''
साहजिकच चित्रपटाच्या कथेविषयी मनात उत्सुकता निर्माण झाली. "ऐका दाजिबा' ही कथा घडते एका वारकरी कुटुंबात. दाजिबा आणि रुक्मिणी हे वारकरी जोडपे. दाजिबाच्या भूमिकेत आहेत अशोक सराफ तर रुक्मिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे स्वतः किशोरी शहाणे. रुक्मिणीच्या दोन्ही बहिणींची लग्नं करायची आहेत. पण हे विवाह मराठमोळ्या मुलांशीच व्हावेत, अशी रुक्मिणीची इच्छा आहे. पण होतं असं की, या दोन्ही बहिणी अमराठी मुलांच्या प्रेमात पडतात. एकीकडे बायकोचा आपल्या बहिणींची लग्नं मराठीच कुटुंबात करून देण्याचा आग्रह; तर दुसरीकडे मेहुणींच्या लग्नाची जबाबदारी यात तारांबळ उडते ती दाजिबाची. पुढे काय होते ते आपल्याला "ऐका दाजिबा' पाहून कळेल.
किशोरी शहाणे या चित्रपटाच्या निमित्तानं निर्माती, अभिनेत्री व वेशभूषाकार अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडत आहे. ती म्हणते, ""निर्माती म्हणून मी एक ठरवलं की, आपला चित्रपट हा उत्तमच असायला हवा. त्यात चांगले कलाकारच असले पाहिजेत. "दाजिबा'ची भूमिका तर अशोक सराफ यांनाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे. मुक्ता बर्वे, प्रिया बापट, प्रसाद ओक या कलाकारांच्या तारखा मी तब्बल आठ ते नऊ महिने अगोदरच "बुक' केल्या होत्या. चित्रपटाचं शूटिंग डोंगरगाव, कोळवणच्या निसर्गरम्य परिसरात केलं गेलं आहे. माझे पती दीपक बलराज-विज हे प्रथमच मराठी चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत दीपकजींचा जो अनुभव आहे, त्याचा फायदा निश्चितपणे या चित्रपटाला झाला आहे.''
रुक्मिणीची मराठमोळी व्यक्तिरेखा साकारताना मात्र किशोरीला अजिबातच टेन्शन नव्हतं. मुळात अशोक सराफ व किशोरी शहाणे यांनी अनेक चित्रपटांतून एकत्र काम केल्यानं त्यांची "केमिस्ट्री' उत्तम जुळते. अशोक सराफ व किशोरी हे दोघंही प्रत्येक दृश्याची तालिम करायचे. प्रत्येक दृश्य हे उत्तमच सादर व्हायला हवं, याबाबत शूटिंगच्या वेळी दोघंही आग्रही असायचे.
वेशभूषाकार म्हणून काम करताना आपला अनुभव काय होता, याविषयी किशोरी म्हणते, ""मोहट्याची रेणुका' या चित्रपटाचे कॉश्च्युम्सही मीच डिझाईन केले होते. सर्वप्रथम आपण जेव्हा चित्रपट पाहतो, तेव्हा आपलं लक्ष जातं ते व्यक्तिरेखेच्या कॉश्च्युम्सकडे! त्यामुळे व्यक्तिरेखेला योग्य व साजेसे असे कॉश्च्युम्स असलेच पाहिजेत, याकडे मी जातीनं लक्ष दिलं.''
किशोरी उत्तम नर्तिका असल्याने चित्रपटात एक लावणी असावी, याबाबतीत दीपक बलराजजींचा आग्रह होता. यात एक लावणी असून वैशाली सामंतनं ती गायली आहे. फुलवा खामकर यांनी नृत्य-दिग्दर्शन केलंय. लावणीचं चित्रण स्वतः किशोरी, मुक्ता बर्वे, प्रिया बापट व अशोक सराफ या कलाकारांवर झालंय. चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे.
चित्रपटात शक्ती कपूर याचीही भूमिका आहे. रूपेश पाटोळे हा कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमच एका मोठ्या भूमिकेत येत आहे. चित्रपटाबद्दल किशोरीजींच्या खूप अपेक्षा आहेत व त्या निश्चितच पूर्ण होतील याची त्यांना खात्री आहे.