शेजार हा सुखाचा...
सगळेच जण काही सर्वगुणसंपन्न नाहीत. पण अडीअडचणीला मदत मिळते ती शेजाऱ्यांचीच. चांगल्या गोष्टींकडे बघून दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले तर शेजाऱ्यांचा सहवास किती सुखाचा होतो ते पाहा. पूर्वी भारतात अन् आता कॅनडात मी हे अनुभवते आहे...
भारतात राहत असताना मी महाराष्ट्रातील बऱ्याच गावांत राहिले. कोणतेही गाव, जागा बदलली, की शेजारपाजार व जवळपास राहणाऱ्या व्यक्तींचा आधार वाटतो. जेथे राहिले तेथे चांगलीच माणसे भेटली. त्यांच्याशी अजूनही संबंध आहेत. आता कॅनडात राहताना येथेही छान शेजार मिळाला. दोन्हीकडील शेजारधर्मात सांस्कृतिक फरक असला, तरी "मानवतावादी' दृष्टिकोन सारखाच आहे.
माझा जन्म पुण्याचा. काही महिने पुण्यात गेल्यावर माझी आई नोकरीला रुजू झाली. तिला मला पाळणाघरात ठेवायचे नव्हते म्हणून माझी रवानगी साताऱ्याला आजी-आजोबांकडे झाली. तेव्हा आमचे घर गुजरआळीत होते. सगळ्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. कुठेही जातीपातीची भाषा नाही, तर उलट आदराची भावना होती. माझी आजी रोज तिन्हीसांजेला रामायण, महाभारतातील गोष्टी सांगायची व श्लोक, गीतेचे अध्याय व पाढे म्हणून घ्यायची. त्या वेळी गल्लीतील बहुसंख्य मुले-मुली यायची. माझे आजोबा नावाजलेले संस्कृत विद्वान आणि गावातील आदरणीय व्यक्ती असल्याने अनेक ठिकाणांहून लोक येत असत. गल्लीतील अनेक मंडळी त्यांना "गुरुजी' म्हणत. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात आजोबांचा सल्ला घेत. आजोबांनीही त्यांना आपल्या अपत्यासारखी कायम वागणूक दिली. अजूनही भारतात गेले, की आवर्जून भेटी होतात.
मला आठवते, की माझी आजी अचानक आजारी झाली. घरातले सगळे हॉस्पिटलमध्ये गेले. आम्ही भावंडे लहान म्हणून शेजारी यादवांकडे राहिलो. मी आजीच्या आठवणीने रडले तेव्हा शेजारच्या काकूंनी, मोठ्या आईने खूप धीर दिला. तेथेच जेवलो नि झोपलो. रात्री समजले, आजी गेली. तेव्हाही शेजारची कुटुंबे पोटाशी धरून डोळे पुसत होती, शाळेत सोडत होती.
पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी मी कऱ्हाडला दोन वर्षे होते. शहा नावाच्या कुटुंबात राहत असे. तसेच येथे दक्षिणी, उत्तरी, कोल्हापुरी पुष्कळ कुटुंबे होती. सगळीकडे इतका प्रेमाचा पाहुणचार असे, की काही दिवसांतच घरची आठवण कमी झाली नि आई-वडिलांची काळजी. लॅबमधून फार उशीर झाला, तरी कोणी तरी डबा घेऊन ठेवी. बरे नसेल तर हक्काने घरी जेवण मिळे. सणांना तर भलते लाड. माझा गणपतीत कार्यक्रम असला, तरी त्यांचे प्रेम उतू जायचे. अर्थातच, अभ्यासातून वेळ मिळाला की मीही त्यांना जमेल तशी मदत करायचे. मुलांची नाटके बसवून दे, आजींचे पाय चेपून दे, कोणाच्या मुलाच्या संस्कृतच्या शंका सोडव, कुणाची भाजी आणून दे. असाच लहानपणापासून गुजराती मंडळींशी जो स्नेह जमला तो अजूनही आहे.
इथले शिक्षण संपताच मला पुण्यात नोकरी मिळाली. पुण्यात वडिलांचे घर होतेच; पण फ्लॅटसंस्कृती विचित्र वाटायची. हळूहळू सवय झाली तशी मजा यायला लागली. आता माझा स्वभाव बोलका असल्याने ओळखी व्हायला वेळ लागला नाही. काही कुटुंबांशी खूप मैत्री झाली. सर्व वयाच्या मैत्रिणी झाल्या. हक्काने येणे-जाणे झाले. एकत्र पर्वतीला जाणे, मैफिली, नाटकांना जाणे, केलेले पदार्थ आवर्जून एकमेकांना देणे, अडचणीला पडेल ती मदत करणे, मनातील सुख-दुःखे मोकळेपणाने बोलणे यामुळे सोसायटीत शिरताच ऊबदार वाटायचे. जास्तीत जास्त कुटुंबांचा आधारच होता. याला अपवाद म्हणजे समोरचे घर, छान सुशिक्षित; पण मजेदार. रोज सकाळी माझ्या दारातल्या कठड्यावरून कपडे वाळत टाकीत ते पार संध्याकाळपर्यंत.
कित्येकदा नीट सांगून पाहिले; पण कसचं काय. कधी कपडे सारून पाहिले. माझे दार बंद झाले, की त्यांची मुलगी क्षणार्धात ते सरळ करून जात असे. पुढे रंगपंचमीला मात्र कोणीतरी, मी घरी नव्हते बरं! त्यांचा पूर्ण रंगपालट केला, पण समोरच्यांवर परिणाम शून्य. संशय माझ्यावर, त्यामुळे संबंध बिनसले. आनंदाची गोष्ट म्हणजे येथे रात्री नऊनंतर रियाज करूनही कोणी तक्रार केली नाही. हा पुण्याचा दहा वर्षांचा मुक्काम होतो, तोच लग्न करून कॅनडात आले.
कॅनडात आल्यावर "नवरा' सोडून कोणीही ओळखीचे नाही, आजूबाजूला भारतीय नाहीत वा मला दिसले नाहीत. अशातच काही गोऱ्या शेजारिणी मैत्रिणी झाल्या. आम्ही नियमित चालायला जात असू. सुरवातीला तिथल्या परीक्षा देत असताना लोरेन नावाची मैत्रीण घरी येऊन मार्गदर्शन करी. माझे पेपर तपासून देई. ही प्राध्यापिका होती. मी कधी कंटाळले तर कॉफीला न्यायची. या मैत्रिणींना खाऊ घालतानाच माझे पाककौशल्य हळूहळू सुधारले. या कॅनेडियन शेजाऱ्यांना पावभाजी, भेळ, इडलीची चटक लावली. याच दरम्यान शोध लागला, की शेजारी एक पंजाबी-इराणी कुटुंब आहे. बायको मुंबईकर पंजाबी व नवरा मुंबईत वाढलेला इराणी. त्यांना आम्ही मराठी आहोत याचा फार आनंद झाला. तेव्हा माझी नोकरी, कार्यक्रम, परीक्षा असे. सगळेच एका वेळी चालू होते. त्यामुळे सुरवातीला या मंडळींकडे मी लक्ष दिले नाही. वाटले त्यांनी आपल्यासाठी करायचे नि आपण वेळ देऊ शकलो नाही तर बरोबर नाही. पण या शेजारिणीने पुढाकार घेऊन ओळख वाढवली. ही शेजारीण अचानक ताजे जेवण घेऊ येई. कधी सकाळी-सकाळी येऊन "मी चहाला आल्ये' म्हणून एकत्र चहा होई. माझ्या सुटीदिवशी मी तिच्या घरी रियाझ करी व त्या वेळी तिचे पेंटिंग करणे चालू असे. ओघातच जेवण तिकडेच होई. माझ्या गरोदरपणात तर तिने बहिणीप्रमाणे डोहाळे पुरवले. त्याच दरम्यान आम्ही नवीन घरी राहायला गेलो.
नवीन घराशेजारील कुटुंब पंजाबी, जवळपासचे गुजराती, बंगाली, युरोपियन. या लोकांच्या ओळखी झाल्यावर यांचा पाहुणचार लाजायला लावणारा. इतका प्रकार मी कधी मराठी लोकांत न पाहिलेला. माझी ही पंजाबी शेजारीण जाऊ-येऊ लागली. सगळ्यांचेच रुटीन अतिबिझी असले, तरी नियमित फोन करणारी. स्वतःच्या अडचणीला हक्काने मदत मागणारी. या सगळ्यांमुळे एक सुखाची भावना अनुभवाला येते, की प्रसंगाला आपले कोणी आहे. एकटेपणा, भावनिक साचलेपणा जाणवत नाही.
आपली सुख-दुःखे, ताणतणाव तसेच मिळालेले यश आपसांत वाटून आयुष्य समृद्ध होतेय. कॅनडातील दहा वर्षांच्या वास्तव्यात अनेक भारतभेटी झाल्या. आई-वडिलांनी घर बदललेले. इथेही वस्तीत सर्व तऱ्हेची कुटुंबे. काही शेजारी खेड्यांतून शिक्षणासाठी शहरात आलेली. माझे लहान बाळ शेजारील लहान मुलांशी खेळू लागले. आम्हाला तिथल्या मुलांचा खूप लळा लागला. शालेय मुलींचे बाळांशी कलाकलाने खेळण्याचे कौशल्य अजब होते. त्यातच माझे अचानक छोटेसे ऑपरेशन झाले.
माझ्यावाचून न राहणारा माझा मुलगा आनंदाने या मुलांत रमला. त्यांच्याबरोबर जेवला. आम्ही परत जाताना ही तीनही कुटुंबे अक्षरशः रडली. सध्याच्या प्रॅक्टिकल जमान्यात असे प्रसंग क्वचितच येतात आणि बरंच शिकवून जातात.
माझ्या नुकत्याच झालेल्या भारतभेटीत मी पुण्यात माझ्या बहिणीच्या फ्लॅटमध्ये राहत होते. इथे बऱ्याच जणांच्या आधीपासून ओळखी होत्या आणि आम्ही दोन महिने राहणार होतो. बहुतांशी शेजारी आपुलकीने वागणारे होते. मी व माझा तीन वर्षांचा मुलगा दोघे राहतो हे बघून हवे-नको विचारायचे. कोणालाही वेळ नसताना आवर्जून दोन मिनिटे डोकवायचे. प्रसंगी तासभर मी मुलाला सोडू शकत होते. एक काकू रियाझाला स्वतःची हार्मोनिअम द्यायच्या. अजून काय हवे?
माझे असे अजिबातच मत नाही, की कोणाचा कामाचा वेळ घ्यावा. निरर्थक जाऊन बसावे. परंतु, इतर नातेवाईक, मित्रमंडळी असली तरी शेजारी, जवळपास बरे संबंध असावेत, अगदी ढीगभर नाही तरी मोजके. यावरून मला एक प्रसंग आठवला. माझ्या माहितीतील एक आजी आपल्या मुलीकडे राहायला आल्या. यांच्या मुलीचे फारसे जिव्हाळ्याचे सोडा; साधेही शेजारी संबंध नाहीत. मुले जवळ न राहणारी. अशात या आजी अचानक वारल्या. जे कोणी दोन नातेवाईक आले, त्यांना या आजींचा मृतदेह उतरून खाली आणताना नाकीनऊ आले. या प्रसंगी शेजारचे काही लोक आपणहून मदत करू का, असे विचारायला आले; पण या बाईंनी स्पष्टपणे "नाही' सांगितले! बोलावलेल्या शववाहिकेच्या चालकाला दादापुता करून हात लावायला सांगितला व त्याने हे काम आपले नाही हे सांगितले. एकुणात खांदा द्यायलाही चार माणसे नाहीत! चांगले माणूस म्हणून जगलेल्या आजीबाईंचा अखेरही दुर्दैवी ठरला. अशा माणसांना काय म्हणावे? यांच्या वेळी मदतीला कोण धावेल हे सांगायला नकोच!
आता सगळेच जण सर्वगुणसंपन्न नाहीत. चांगले तर बरे-वाईट, मजेशीर अनुभव यायचेच; पण चांगल्या गोष्टींकडे बघून दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले तर सगळ्यांच्याच हिताचे नाही का? एक मात्र नक्की, सध्याच्या जगात वेगाने येणाऱ्या सुबत्तेत एकाकीपणा, नैराश्य व इतर मानसिक प्रश्न त्याच वेगाने येतील यात शंका नाही.