आपलं असलं तरीही...
आपलं मूल चुकीचं वागत असेल आणि आणि प्रयत्न करूनही ते बदलू शकत नसेल तर आपण लगेच हतबल होतो. त्यापेक्षा त्या मुलाला योग्य वेळी आणि योग्य त्या शब्दांत समज द्यायला हवी. धडधाकट मुलाला विशिष्ट काळानंतर आश्रय नाही, हे स्पष्टपणे सांगणं म्हणजे एका अर्थी त्याला त्याच्या पायावरच उभं करणं असतं...
दार उघडल्यावर समोर रोहिणीताईंना बघितलं, पण क्षणभर माझा विश्चासच बसेना. मी त्यांना दोन वर्षांनी पाहत होते, पण त्या 10 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्यासारख्या दिसत होत्या. आमच्या शाळेतील अतिशय विद्यार्थिप्रिय बाई होत्या त्या. त्यांना पाहिल्यावर त्यांचा लोभसवाणा मुलगा राजीव डोळ्यांसमोर आला. त्यांच्याबरोबर तो कधीमधी शाळेत यायचा. त्यांना बघितल्यावर शाळेचे रम्य दिवस डोळ्यांपुढे तरळून गेले.
""काय म्हणता बाई? किती दिवसांनी गाठ! ...आणि हे काय? तुमची तब्ब्येत इतकी खराब कशाने झाली ?''
माझ्या प्रश्नांच्या भडिमाराने हसत त्या म्हणाल्या, ""अगदी पूर्वीसारखीच आहेस बघ तू! एकापाठोपाठ एक प्रश्न!""
मी ओशाळवाणं होऊन म्हटलं, ""अहो, सॉरी हं. बसा ना. माझ्याकडे काय एवढं काम काढलंत?''
""खरं सांगू सुधे... गेलं वर्षभर तुझ्याकडे यायचं घोकत होते, पण धीर होत नव्हता, आणि आता राजीव सुधारेल अशी खोटी आशाही होतीच.''
""काय... काय झालं राजीवला?'' तो पाच-सहा वर्षांचा असताना बाईंचे यजमान वारले होते, व त्यांनी मोठ्या धीराने पुढे संसार केला होता.
""काय सांगू तुला? तुझ्या कानावर नाही का आलं?''
""नाही हो. माझा तसा कोणाशीच तितका संपर्क राहिला नाही. ''
""तुला काय सांगू! राजीवने शिक्षणही पुरं केलं नाही. मित्रांबरोबर उनाडक्या, माझ्याशी अरेरावी व उद्धटपणा आणि खूप मोठ्या, लाखांच्या गप्पा... आणि आता तर माझ्यावरही परवा हात टाकला.""
""काय सांगता बाई...? तुमच्यावर?"'
""होय ना. म्हणून तर तुझ्याकडे आले काय करू याचा सल्ला घ्यायला. परवा काय झालं, माझ्या कानावर आलं होतं की आमच्या मागच्या गल्लीतल्या एका पंजाबी मुलीशी त्याचं सूत जुळलं आहे म्हणून. मी त्या मुलीला गाठलं आणि घरी बोलावलं व सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण केलं. तिचा प्रथम विश्वास बसेना. तिला त्याने सांगितलं होतं की त्याचा मोठा बिझनेस आहे. ती पदवीधर आहे, नोकरी करणारी आहे. मी तिला पूर्ण कल्पना दिली, की हा पदवीधरही नाही, नोकरी-व्यवसायही काही करत नाही. घरात एक पैही देत नाही. बाहेर उधारीही खूप करून ठेवली आहे. तिला धक्काच बसला. माझे आभार मानून ती लगबगीने निघून गेली. आता हे त्याच्यापर्यंत गेल्यावर हा भयंकर भडकला. घरी येतानाच पिऊन आला व माझ्या अंगावर धावून आला व शिव्या देऊ लागला. याआधीही पैशावरून होतच असे. रितूने नोकरी करून शिक्षण पूर्ण केलं. आता ती उत्तम नोकरी करत आहे. आता लग्नही ठरवलं आहे तिने. त्यामुळे तिच्यावर राग राग. तिने तर आता त्याच्याशी बोलणंही टाकलं आहे. आता त्या मुलीशी मी हे बोलले, यात काही चूक केली का?""
""तुुम्हाला काय वाटलं सांगताना? तुम्ही रागारागात तिला भेटून बोलताना का सर्व परिणामांचा विचार केला होतात ?''
"" तसं नाही गं, सगळा विचार केलाच. त्याला आवडणार नाही हे माहीतच होतं.''
""म्हणजे त्याची प्रतिक्रिया काय होईल याची पूर्ण कल्पना तुम्हाला पूर्वानुभवावरून होतीच. पण हे सांगणं महत्त्वाचं वाटलं म्हणून तुम्ही बोलण्याचा निर्णय घेतलात ना?''
""हो. अगं, आज याच्या जबाबदारीचं ओझं मी बाळगतेय. त्यात लग्नबिग्न करून आला तर मी कुठवर पोसणार ?''
""म्हणजे तुम्हाला हे मनोमन पटलं तरी तुम्ही साशंक आहात का?''
""काय करणार? आईचं नातं मोठं कठीण! आपणच आपल्या मुलाचा संसार सुरू करण्याआधी त्यात खोडा घालण्याचं पाप केलं याचं वाईट वाटतं गं!''
""बाई, हे मी समजू शकते. त्यांच्या बाबांच्या पश्चात तुम्ही दोघांना मोठं केलंत आणि त्याचं त्याने चीज केलं नाही हे खरं. पण तुमची पहिली जबाबदारी स्वत:ची आणि मग मुलांची, खरं ना? मग तुमच्या स्वत:च्या भविष्याची तरतूद अगोदर, खरं ना?''
"'अगदी खरं. गेल्या वर्षी हा माझ्या खूप मागे लागला होता, तुझ्या प्रॉव्हिडंट फंडावर कर्ज काढून मला बिझनेससाठी दे म्हणून. आणि खोटं कशाला सांगू, माझंही मन जरा चलबिचल झालं होतं, करावी का मदत म्हणून. पण रितूने पार मोडता घातला, की अजिबात नको. तुला नंतर ते फेडायची जबाबदारी पडेल. त्याचाही राग आम्हा दोघींवर आहे. घरात असला की सारखा गुरकावूनच बोलतो आणि सदा मला ऐकवतो, मोठे हरिश्चंद्राचे अवतार आहात! तुम्हाला दरिद्री राहणंच आवडतं ना!''
""आणि मग तुम्ही काय बोललात?''
""त्याच्यापुढे काय बोलणार मी बाई? मी आपली सांगते इज्जतीने राहावं म्हणून.''
""आणि या उपदेशानं तो बदलेल अशी खोटी आशा तुम्हाला वाटते ना ?''
""होय गं बाई.''
""बाई, मला खरं सांगा... तो बदलला तर आपल्याला सर्वांनाच आवडेल; पण तुम्हाला अगदी मनापासून तो बदलण्याची शक्यता किती वाटते?''
रडवेल्या स्वरात त्या म्हणाल्या, ""मी तर अगदी आशाच सोडली आहे गं.''
""मग मन घट्ट करून त्याचा स्वीकार करायला हवा आणि आपली स्वत:ची जपणूकही करायला हवी. सचोटीने वागण्याचा निर्णय तुम्हा दोघांचा होता ना, मग आता तो त्याला पटविण्याचा निरर्थक प्रयत्न करण्यात काय मतलब? त्याच्या या अशा बोचऱ्या बोलण्यामागे त्याचा हेतू आहे, की तुम्ही त्याला उत्तर देत राहावं. आणि तो तुम्हीच साध्य करून देत आहात. तुुम्ही तसा निर्णय का घेतला हे त्याला पटवायला तुम्ही बांधील आहात का? याउलट, तुम्ही त्याच्यासाठी ज्या गोष्टी करत आहात- उदा. निवारा आणि अन्न, हे तुम्ही कधीपर्यंत करणार याची त्याला स्पष्ट जाणीव द्या. त्याच्या चुकीमुळे तुम्ही हतबल होण्याची गरज आहे का? तुमच्या मागे रितू भक्कम उभी आहे. स्वत:ला कमकुवत समजू नका व त्याच्याशी स्पष्ट बोला. त्यातून त्याने धडा घेऊन तो बदलला (जी शक्यता एखादा टक्काच आहे) तर त्याचंच आयुष्य रुळावर येईल ना? मग उठा तर. बोला रितूशी फोनवर.''
अशा उर्वरीत टिप्स वाचा 'तनिष्का'च्या जुलैच्या अंकामध्ये.
अंक मागणीसाठी संपर्क करा -
tanishka@esakal.com वर
तनिष्काच्या ऑर्कूट कम्युनिटीवर जॉईन व्हा.