विक्रांत तुमच्या दारात आला नाही, म्हणून त्याला भीक नाही?
भीष्मराज बाम
Friday, September 03, 2010 AT 12:15 AM (IST)
तेजस्विनी सावंतने 2006 मध्ये मेलबर्नला झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही पदके मिळविली होती. तेव्हा तिला पाच लाख रुपये देण्यात आले. आता तिने जागतिक स्पर्धेत विश्वविक्रमाच्या बरोबरीसह सुवर्णपदक मिळविले. तरीसुद्धा तिला पाचच लाख रुपये देण्यात आले. हा तेजस्विनीचा अपमानच नाही का? सरकारला राष्ट्रकुल आणि जागतिक या स्पर्धांमधील फरक कळतो का? याच सरकारने ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझ मिळविलेल्या करनाम मल्लेश्वरीचा 51 लाख रुपये देऊन सत्कार केला होता. मल्लेश्वरी दुसऱ्या राज्याची असली तरी शेवटी तिने भारतासाठीच ऑलिंपिक पदक मिळविले होते, याची मला कल्पना आहे आणि तिचा मला अभिमान वाटतो. पण जेव्हा जागतिक स्पर्धेत अंजली वेदपाठक-भागवतने "चॅंपियन ऑफ चॅंपियन्स' हा किताब जिंकला, तेव्हा तिला छदामही द्यावासा सरकारला का वाटला नाही? त्यांना जागतिक स्पर्धा, "चॅंपियन ऑफ चॅंपियन्स' किताब, त्याचे महत्त्व, श्रेष्ठत्व याची काडीमात्र कल्पना नाही, हेच सिद्ध होते.
मुळात खेळाडूंनी यशस्वी होऊ नये, जिंकू नये, असेच आपल्या नेतेमंडळींना वाटते; कारण मग त्यांच्या आवाजाला वजन प्राप्त होईल, शब्दाला किंमत द्यावी लागेल, ते आपल्याला डोईजड होतील, अशी सरकारलाच नव्हे तर संघटनेलाही भीती वाटते. नेत्यांना फक्त स्पर्धांचा तमाशा आयोजित करायचा, उद्घाटन आणि बक्षीस समारंभात मिरवायचे, इतकेच ठाऊक आहे.
क्रीडा प्रबोधिनी बांधली, खेळाडूंना प्रवेश दिला, असे सरकार यावर मला ऐकवेल. पण खेळाडूंना सरावासाठी साहित्य, बंदुकीच्या गोळ्या, टार्गेट आदी सामग्री पुरेशी मिळते का? गोळीअभावी "ड्राय प्रॅक्टिस' करणारे, संघटनेकडून साहित्य विकत घेण्यासाठी कर्ज काढणारे खेळाडू-पालक मला ठाऊक आहेत. सरकारची इच्छा असेल तर त्यांचे शिष्टमंडळ घेऊन येण्याची माझी तयारी आहे. प्रबोधिनीच्या सर्व खेळाडूंना पुरेसे "ऍम्युनिशन' मिळत नाही. आता प्रशिक्षकांविषयी थोडी माहिती देतो. पिस्तूल शूटिंग आणि रायफल शूटिंगसाठी आपल्याकडे प्रशिक्षकच नाहीत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात परदेशी प्रशिक्षक आणण्याची घोषणा केली. हे सारेच हास्यास्पद आहे.
तुमच्या दारात आला नाही, म्हणून भीक दिली नाहीत?
"विक्रांत घैसासला पैशाची गरज होती, पण आम्हाला माहितीच नव्हते. त्याची आई कार्यक्रमात जाहीर बोलली तेव्हाच आम्हालासुद्धा कळले. त्याला ग्रेस मार्क मिळण्याबाबतही काही कल्पना नव्हती. त्याची कामगिरी काय झाली, हेसुद्धा आम्हाला त्याने सांगितले नाही,' असे आक्षेप क्रीडा खात्याने उपस्थित केले आहेत. विक्रांत त्यांच्या दारात गेला नाही, म्हणून त्याला भीक मिळाली नाही, असेच दिसतेय. अरे काय चाललेय काय? विक्रांत शासनाच्याच क्रीडा प्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. त्याची कोणत्या स्पर्धेसाठी निवड झाली, त्याला मदतीची गरज आहे का, तो स्पर्धेला गेला का, त्याची कामगिरी काय झाली, याची कल्पना सरकारच्या जबाबदार अधिकाऱ्यांनाच नसावी? वर आम्हाला माहितीच दिली नाही, असा कांगावा केला जातोय. यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकते. विक्रांतला रेंज उपलब्ध करून देतो, त्याच्या सोईच्या वेळेनुसार सरावाची परवानगी दिली जाते, असेही मी वाचले. अरे म्हणजे तुम्ही काय उपकार करता की काय? ही रेंज मग बांधलीय तरी कुणासाठी? खेळाडूंसाठीच ना, मग त्यांना सराव करू देतो, असे तोंड वर करून सांगणे शोभते का?
या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावे...
भीष्मराज बाम राज्याचे माजी पोलिस महासंचालक आहेत. याशिवाय राज्यात नेमबाजीची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले आहे. ते राज्य नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष होते. क्रीडामानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी क्रिकेटपटू राहुल द्रविड, बिलियर्डसपटू गीत सेठी यांच्यासह असंख्य नेमबाजांना मार्गदर्शन केले आहे. तेजस्विनीचा सत्कार, त्या कार्यक्रमात अनघा घैसास यांनी मांडलेली व्यथा या पार्श्वभूमीवर बाम यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
1) राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर दिले तेवढेच बक्षीस जागतिक स्पर्धेतील यशानंतर दिले. याचा अर्थ दोन्ही स्पर्धांचा दर्जा एकच का? "चतुर्थश्रेणी'चा दर्जा असलेल्या राष्ट्रकुलइतकीच किंमत जागतिक स्पर्धेला कशी?
2) करनाम मल्लेश्वरीला ऑलिंपिक ब्रॉंझनंतर 51 लाख रुपये, पण "चॅंपियन ऑफ चॅंपियन्स' हा किताब जिंकलेल्या अंजलीला बक्षीस का नाही?
3) क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंना किमान साहित्य का उपलब्ध होत नाही?
4) विक्रांत घैसास प्रबोधिनीचाच खेळाडू असताना त्याच्यासमोरील निधीची अडचण अधिकाऱ्यांना ठाऊकच कशी नाही?
(शब्दांकन - मुकुंद पोतदार)