पुणे - जुन्या पिढीतील लेखिका वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन (वय 93) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पटवर्धन यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसुंधरा पटवर्धन या पूर्वाश्रमीच्या वसुधा खानविलकर. 18 एप्रिल 1917 रोजी त्यांचा जन्म झाला. इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचा बडोद्याचे शास्त्री असलेल्या कृष्णाजी पटवर्धन यांच्याशी विवाह झाला. "शोध' हा त्यांचा कथासंग्रह 1955 मध्ये प्रकाशित झाला. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन असे विविध वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या पटवर्धन यांच्या नावावर चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांच्या "नेत्रा', "प्रीतीची हाक' या कादंबऱ्या आणि "ऋणानुबंध', "संघर्ष', "भोवरा', "उपासना', "अक्षता', "अद्भुत' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. अमेरिका वारीविषयी त्यांनी प्रवासवर्णनपर लेखन केले आहे.
पटवर्धन यांच्या "मधूची आई' या कथेवर आधारित "एकटी' चित्रपटाच्या कथेसाठी आणि "हिरकणी' या नाटकासाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे त्यांना 1994 मध्ये गौरववृत्ती प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत "शरदबाबू पुरस्कारा'ने त्यांना 2002 मध्ये गौरविण्यात आले होते.