सांगली जिल्ह्याला मिळणार 9 हजार टन धान्य
सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 04, 2010 AT 12:30 AM (IST)
विष्णू मोहिते - सकाळ वृत्तसेवा
सांगली - धान्य सडण्यापेक्षा, गरिबांना मोफत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. आगामी सहा महिन्यांसाठी सर्वच लोकांना मुबलक धान्य मिळणार आहे. जिल्ह्याला येत्या सहा महिन्यांसाठी तब्बल 9 हजार टन धान्य मिळणार आहे.
रमजान, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा या सणांच्या काळात लोकांची सोय होणार आहे. मात्र, शिधापत्रिकांवर दिल्या जाणाऱ्या गव्ह्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आहे. हलक्य दर्जाचा गहू दळल्यानंतर कोमट वासाने लोकांना खाण्याच्या लायकीचा राहात नाही. तरीही हा गहू 7 व तांदूळ 10 रुपयांनी लोकांच्या माथी मारला जातो आहे. हा गहू दळतानाही बारीक पिठाऐवजी सर्वच गिरणीतून लोळ्या बाहेर पडतात. प्रत्येक चार दळपानंतर जात्यांची स्वच्छता करताना गिरणी चालक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, ते हे नाकारू शकत नाहीत.
धान्य गोदामात कुजून जाणारे धान्य न्यायालयाने मोफत वाटण्याचे आदेश केंद्र सरकालला दिला. ते धान्य गरिबांची व्याख्या ठरवून मोफत देले जाईल, असे अपेक्षित होते; मात्र गेल्या चार दिवसांपासून सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांसाठी मुबलक धान्य देण्याची योजना सरकारने आणखी. आणि त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. केंद्राकडून सर्व राज्यांना 25 लाख हजार टन धान्य वाटप होईल. त्यातील 9 हजार टन धान्य सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यासाठी दिले जाणार आहे. त्यात महिन्याला 1199 टन गहू व 305 टन तांदूळ दिला जाणार आहे. यामुळे देशातील लोकांना ऐन सणांच्या काळात गहू व तांदूळ मिळणार आहे. मात्र, त्याच्या दर्जा खराब असल्याने तो आनंद किती दिवस टिकणार आणि तो दुकानातून ग्राहक कितपत उचलणार हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
धान्याचे दर वेगवेगळे
सध्या चांगल्या प्रतीचा गहू 14 रुपयांपासून ते 20 रुपये किलोपर्यंत विकला जातो आहे. तो सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारा नाही. शिधापत्रिकेवर मिळणारा गहू अगदी केसरी कार्डधारकालाही 7 रुपये किलोने मिळतो, तर द्रारिद्य्ररेषेखालील (पिवळे कार्ड) लाभार्थींना हाच गहू 5 रुपयांला मिळतो. अंत्योदय लाभार्थींना हाच गहू 2 रुपये व अन्नपूर्णा लाभार्थींना मोफत दिला जातो. तर तांदूळ खुल्या गटासाठी 10, गरिबांना 6 व 3 रुपये किलोने विक्री होते.