भूस्खलनामुळे नागरिकांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 03:02 PM (IST)
वणी (जि. यवतमाळ) - घुग्गुस-उकणी-वणी मार्गावर वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी खुल्या खाणीच्या मुख्य रत्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचे गेल्या आठवड्यापासून भूस्खलन सुरू झाले आहे. भूस्खलनाकडे वेकोलीने लक्ष पुरविले नसल्याने आज (रविवार) या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, भूस्खलन वाढल्यास पश्चिम महाराष्ट्राकडे होणारा वीजपुरवठा पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे.
येथील जमिनीतील माती व ढिगाऱ्याची माती गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा शनिवारी (ता. तीन) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माती रस्त्यावर येऊन पडल्याने मार्ग पूर्णतः बंद पडला होता. यामुळे 150 कोळसा ट्रक़, टिप्पर व स्कूल बसचे विद्यार्थी रस्त्यावर अडकले होते. घटनेची माहिती मिळताच वेकोलीकडून ग्रेडर यंत्राद्वारे रस्त्यावरील सर्व माती हटविण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होते. भरपावसात दीड तासानंतर वाहतूक मोकळी करण्यात आली. हे भूस्खलन पिंपळगाव कोळसा खाणीच्या दोनशे मीटरच्या आत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या ढिगाऱ्याच्या बाजूने अतिउच्चदाबाची विद्युत टॉवर लाईन मुंबईपर्यंत गेले असल्याने पुन्हा पश्चिम महाराष्ट्राला भारनियमनाचा फटका बसेल, असे सांगण्यात येत आहे