नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने धोरण ठरविण्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी व्यक्त केले. सडणारे धान्य गरिबांना मोफत देण्याचे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. देशात दारिद्रयरेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ३७ टक्के आहे. एवढ्या सगळ्यांना मोफत धान्य देणे कसे शक्य आहे, असा प्रश्न डॉ. सिंग यांनी उपस्थित केला.
आपल्या निवासस्थानी काही निवडक संपादकांशी संवाद साधताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. दारिद्रयरेषेखालील सगळ्याच नागरिकांना मोफत धान्य देणे शक्य नाही. आपण अजूनही न्यायालयाचा यासंदर्भातील अंतिम निर्णय वाचलेला नाही. या निर्णयामागील न्यायालयाची भावना आपण समजू शकतो. दारिद्ररेषेखालील नागरिकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध झाले पाहिजे, हे आपण समजू शकतो. त्यासाठीच गेल्या २००४ पासून दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या दरात आम्ही कोणतीही वाढ केलेली नाही, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
गरिबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून केंद्र सरकारने अधिक उपाय योजले आहेत. गरिबांना मोफत धान्य उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि भविष्यात अन्नधान्य उपलब्धच झाले नाही, तर वाटप करण्यासाठी काही राहणारच नाही, असेही त्यांनी सांगितले.