धरणग्रस्तांचा नागपूर महामार्गावर रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 01:22 PM (IST)
अमरावती - डेंबळा धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली धरणग्रस्तांनी औरंगाबाद-नागपूर एक्स्प्रेस महामार्गावरील गुईखेड येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
हे धरण पूर्ण झाले, तरीही अद्याप धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही, अशी धरणग्रस्त गावक-यांची तक्रार आहे. आजच्या आंदोलनात सुमारे २,५०० धरणग्रस्त सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
विदर्भात यंदा जोरदार पाऊस झाल्यामुळे, बहुतेक धरणे भरली आहेत किंवा भरण्याच्या मार्गावर आहेत. डेंबळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याचा मोठा साठा झाल्यामुळे, या क्षेत्रातील गावांमध्ये पाणी शिरते. पावसाळ्याचे चार महिने या गावक-यांना पाण्यातच राहावे लागते. पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे, या मागणीसाठी आजचे आंदोलन पुकारण्यात आले होते.