विकसकाच्या प्रभावामुळे महापालिकेकडून रस्ता बंद
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:09 AM (IST)
मुंबई - जनतेच्या रहदारीसाठी खुला असणारा मालाड-दिंडोशीमधील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते पिंपरीपाडा दरम्यानचा रस्ता सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ विकसकाच्या प्रभावामुळे मुंबई महापालिकेने बंद केल्याचा गंभीर आरोप करून पालिकेच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पालिकेतील विरोधी पक्षनेते व दिंडोशीचे आमदार राजहंस सिंह यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
दिंडोशीमधील हा सुमारे 590 मीटर लांबीचा रस्ता मुंबई महापालिकेने रहदारीसाठी घोषित केले आहे; मात्र तेथील एका विकसकाने या रस्त्याची जागा पत्र्याचे कुंपण घालून बंदिस्त केले आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने संबंधित विकसकाला इमारत बांधकामासाठी "आयओडी' देण्यात आल्याचा आरोप आमदार सिंह यांनी केला आहे. विकसकाची "आयओडी' त्वरित रद्द करावी व जनतेला हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी पालिका अधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या. विकसकाची "आयओडी' रद्द करावी व तेथील जनतेसाठी हा रस्ता रहदारीकरिता खुला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व तसे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले; परंतु तरीही आजपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.