दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले व अधिवास दाखले त्यांच्या शाळेतच देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा येत्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयांच्या मदतीने मोहीम राबविणार आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक ७ ते ९ सप्टेंबरला होत असून, त्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अर्जाचे वाटप केले जाईल.
विद्यार्थी व शाळा
पुणे महापालिका - ३९५ शाळा
पिंपरी-चिंचवड महापालिका - १६५ शाळा
विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची संख्या - सुमारे एक लाख
शिक्षकांनी काय करावे?
विद्यार्थ्यांकडून भरलेले अर्ज कागदपत्रांसह जमा करावेत.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची, त्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगावी.

अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडल्याची खात्री करावी.
विद्यार्थी व पालकांनी काय करावे?
अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.

अर्जात त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.

नागरिक सुविधा केंद्रातून प्रतिज्ञापत्र करून घ्यावे.
सरकारी यंत्रणा काय करणार?
शाळांच्या मुख्याध्यापकांकडे अर्ज देणार.

विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेतच तपासणार.

अर्जात त्रुटी असल्यास ते पुन्हा भरून घेणार.

व्यवस्थित भरलेल्या अर्जाचे दाखले विद्यार्थ्यांना शाळेत देणार.
यंत्रणेची कार्यपद्धती 
मुख्याध्यापकांची बैठक - सात ते नऊ सप्टेंबर

अर्जांचे विद्यार्थ्यांना वाटप

सरकारी कर्मचारी २० ते २५ सप्टेंबरला शाळेत अर्ज तपासणार

त्रुटी असलेले अर्ज पुन्हा भरून घेणार

दाखल्यांचे शाळांमध्ये वाटप

कनिष्ठ महाविद्यालयांची लवकरच बैठक
अधिवास दाखल्यासाठी हे करा
१) दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला अर्ज
२) गावात सलग दहा वर्षे राहत असल्याचा पुरावा- तलाठ्याचा दाखला, मालमत्ता कराच्या पावत्या, वीजदेयके, सात-बारा उतारा, महापालिकेकडील फोटो पास, भाडेकरार ( गेल्या दहा वर्षांतील प्रत्येक वर्षाचा एक पुरावा सादर करावा)
३) महाराष्ट्रात सलग दहा वर्षे राहत असल्याचे पालकांचे प्रतिज्ञापत्र
४) अर्जदार व अर्जदारांचे वडील यांचा शाळा सोडल्याचा दाखला (ज्यामध्ये जन्मस्थळाचे ठिकाण व जन्मतारीख आवश्यक), किंवा जन्मतारखेचा दाखला, किंवा शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट
५) अर्जदार परराज्यातील असल्यास २० वर्षांपासून महाराष्ट्रातील वास्तव्याबाबत महसुली पुरावा (मालमत्तेचे कार्ड, सात-बाराचा उतारा, खरेदी खत, कर पावत्या) सादर करणे आवश्यक, परराज्यातील अधिवास सोडल्याबद्दलचे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर केलेले प्रतिज्ञापत्र
६) अर्जदार किंवा त्याच्या वडिलांचे जन्मस्थळ परदेशातील असल्यास त्यांच्या पासपोर्टच्या छायांकित प्रती
कुठे होईल प्रतिज्ञापत्र?
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पिंपरी व पुणे येथे चार ठिकाणी असलेल्या नागरिक सुविधा केंद्रांवर प्रतिज्ञापत्र करण्याची सुविधा.
या योजनेतील प्रतिज्ञापत्रासाठी केंद्रावर स्वतंत्र रांग.
तेथे प्रतिज्ञापत्राचा आराखडा उपलब्ध, छायाचित्र घेण्याची सोय. आर्थिकदृष्ट्या स्वस्त.
बाहेरून केलेले प्रतिज्ञापत्रही स्वीकारणार.
आवश्यकता भासल्यास रविवारीही नागरिक सुविधा केंद्र सुरू ठेवण्याचा विचार.
योजना कशासाठी?
शैक्षणिक प्रवेशासाठी जून-जुलैमध्ये नागरिक सुविधा केंद्रांवर रोज दोन ते अडीच हजार विद्यार्थी अर्ज करतात. एवढे दाखले देण्याचा ताण सरकारी यंत्रणेवर पडतो. अर्जात त्रुटी राहिल्यास आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी पालकांना अपुरा वेळ मिळतो. या योजनेमुळे शाळेतच दाखला मिळणार. सरकारी यंत्रणांनाही नियोजन करून दाखले देता येतील.
दाखला न मिळाल्यास
अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकदा संधी मिळणार. त्या वेळीही अपुऱ्या कागदपत्रांमुळे दाखला न मिळाल्यास शाळेऐवजी नागरिक सुविधा केंद्रात अर्ज करून वर्षभरात केव्हाही दाखला मिळू शकेल.