जनाची नाही तर मनाची तरी ठेवा!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 26, 2010 AT 12:30 AM (IST)
नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावले
मुंबई - "चिंटू शेखची बाजू घेणारी शिवसेना आता पूर्णतः उघडी पडली आहे. केवळ सुडाच्या भावनेतून त्यांनी आपल्याविरुद्ध मोहीम उघडली असून, चिंटू शेखवरील कथित हल्ल्याचा बनाव निर्माण केला असल्याचे सिद्ध झाले आहे', असे स्पष्ट प्रतिपादन महसूल मंत्री नारायण राणे यांनी येथे केले. "जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवा', असे त्यांनी शिवसेनेला सुनावले.
शिवसेनेला राज्यातील कामगार, विद्यार्थी, कुपोषित किंवा अन्य गंभीर प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत भेटावेसे वाटले नाही; मात्र चिंटू शेखबद्दल शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना शनिवारी जाऊन भेटले आणि त्यांनी माझा राजीनामा मागितला, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे ढोंग उघडे पाडले.
शिवसेनेचे दुकान बंद होणार
शिवसेनेजवळ आता कोणताही कामधंदा उरलेला नाही. कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत, म्हणून सुडाच्या भावनेतून माझ्याविरुद्ध ही मोहीम उघडली आहे, असे राणे म्हणाले. जोपर्यंत मी राजकारणात आणि मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत मी शिवसेना संपविणार आहे आणि आता तर शिवसेनेचे दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेने हे कटकारस्थान आखले आहे. ना नेता ना मुद्दा असलेल्या शिवसेनेला आता डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागत आहे. यावरून आता शिवसेनेत एकही मर्द उरलेला नाही, असेही त्यांनी सुनावले.