गरिबांचा कळवळा असेल तर झोपडपट्टीत रहा
सकाळ वृत्तसेवा
Monday, October 11, 2010 AT 12:15 AM (IST)
सोलापूर - पुणे जिल्ह्यातील "लवासा' प्रकल्पात गरिबांच्या झोपड्या गेलेल्या नाहीत. त्याबाबत काहीच माहिती नसताना उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, त्यांना जर गरिबांबद्दल खराच कळवळा असेलतर त्यांनी "मातोश्री' सोडून झोपडपट्ट्यांमध्ये रहायला जावे, असा टोला महसूलमंत्री नारायण यांनी लगावला.
येथील रंगभवन सभागृहाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांनी राणे यांना "लवासा' प्रकल्पाबाबत प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरेंना या विषयात अज्ञान आहे. त्यांना कामाचा कोणता अनुभव नाही. लवासा एक प्रकल्प आहे. महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे प्रकल्प येताहेत. "लवासा'मध्ये 46 हजार कोटी गुंतवणूक आहे. चुकीचे काही घडले नाही. काही सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. झोपड्या तोडलेल्या नाहीत आणि तोडणारही नाही. सरकार आजपर्यंत नेहमीच झोपडपट्ट्यांना संरक्षण देऊन त्या नियमित करीत आले आहे. या ठिकाणीही असे काही असेलतर ते केले जाईल. उद्धव ठाकरेंना यातील फरकच समजलेला नाही. "लवासा'ला परवानगी देताना चुका झाल्याबद्दलच्या आरोपावरून अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला असता "आता काहीच नाही, करणार' असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.