मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीच होतो. त्यात काही नवल नाही. त्यामुळे या मेळाव्याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. असा टोला महसूल मंत्री नारायण राणे यांनी आज लगावला.
मंत्रालयात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात आयोजित करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीची सूत्रे कॉंग्रेसने राणे यांच्या हाती सोपवली आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख या मेळाव्यात काय बोलतील हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मात्र, या मेळाव्याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र, शिवसेनाप्रमुखांना या वयात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आखाड्यात उतरावे लागत असल्याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.