दुबई - उत्साहात आणि जवळपास चार हजार नागरिकांच्या उपस्थितीत, येथील इंडियन हायस्कूलच्या प्रांगणात भारताचा ६३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
थंडी असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात असलेली उपस्थिती, हीच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाची साक्ष पटवत होती. शाळेचे अध्यक्ष मोहन वालर यांनी सर्व उपस्थितांचे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौन्सुल जनरल संजय वर्मा यांचे स्वागत केले.
ध्वजवंदनानंतर वर्मा म्हणाले, की परदेशस्थ भारतीयांचे राष्ट्राच्या प्रगतीमधील अनमोल असे योगदान आहे. यावेळी महात्मा गांधी यांचेही त्यांनी उदाहरण दिले. गांधीजी हे आजच्या समस्त परदेशस्थ भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. परदेशात राहून आल्यावर गांधीजीनी स्वदेशाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य, हे सर्व परदेशास्थ भारतीयांसाठी नेहमीच स्फूर्तिदायक ठरते.
भारताचे संयुक्त अरब अमिरातीबरोबर असलेल्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंधावर, वर्मा यांनी प्रामुख्याने प्रकाश टाकला. त्याचबरोबर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संदेशाचे त्यांनी वाचन केले. यावेळी इंडियन हायस्कूलच्या विद्यार्थांनी मान्यवरांना मानवंदना दिली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध रंगी, बहुढंगी असे नाटक सदर केले. पाचवी आणि सहावीतील मुलींनी "मा तुझे सलाम" या गाण्यावर केलेले नेत्रदीपक नृत्य, सर्वांची वाहवा मिळवून गेले. बालवर्गाच्या मुलांनी केलेल्या नृत्याने तर कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक मंडळांच्या प्रतिनिधींनीही आपली कला सदर केली. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी आयोजित केलेले 'फन फेअर'. मुख्य कार्यक्रमाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थितांनी खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
एक अत्यंत सुनियोजित आणि उत्साहपूर्ण अशा वातावरणात, दुबई येथे पार पडलेल्या आपल्या मातृभूमीच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहता आले, यामुळे आम्ही मनोमन सुखावून गेलो.





