मणिपूरमध्ये 3 तासांत 30 टक्के मतदान
- वृत्तसंस्था
Saturday, January 28, 2012 AT 12:49 PM (IST)
इंफाळ - मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज (शनिवार) पहिल्या 3 तासांमध्ये तब्बल 30 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.
इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कालापहार, मोतबंग आणि कंगपोक्पी या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचे वृत्त आहे. मतदानासाठी पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमालीची थंडी असल्याने मतदानाला उशिरा जोर चढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बंडखोर गटांनी निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचा इशारा दिल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी 279 उमेदवार रिंगणात आहेत.