diabetes
diabetes

मधुमेहाचा भस्मासुर

जसजशी शक्‍ती कमी होईल तसतसा जीवनाचा आनंद लुटण्याची क्षमता कमी होते. कामामधली कार्यक्षमता कमी झाल्यामुळे मानसिक ताण वाढतो. मानसिक ताण वाढला की पचनशक्‍ती कमी होते, शक्‍तिव्यय होतो, शरीरात साखर ओढली जात नाही. पर्यायाने पुन्हा साखर वाढते. मधुमेह्याच्या बाबतीत मानसिक ताण वाढणे म्हणजे मधुमेहाच्या भस्मासुराला मदत करण्यासारखेच आहे. तेव्हा ध्यान, स्वास्थ्यसंगीत याद्वारे नेटाने व श्रद्धेने मानसिक ताण कमी करण्याची योजना आखून मधुमेह्याची दिनचर्या ठरवावी लागेल.

मधुमेह हा असा एक रोग आहे ज्याला भस्मासुराची उपमा शोभून दिसते. भस्मासुर राक्षसाची गोष्ट सर्वांना माहिती असेल, भस्मासुरला वरदान मिळालेले होते की तो ज्याच्या डोक्‍यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. मधुमेह राक्षसाची ज्याच्यावर अवकृपा झाली त्याच्याही शरीराचे भस्म व्हायला सुरूवात झाली असे समजा. म्हणजेच ताकद कमी, पचन कमी, ऑस्टिओपोरोसिस (अस्थिभंगुरता), चेतासंस्थेची कार्यक्षमता कमी होणे असे जीवनाविरूद्धचे सर्व त्रास या रोगामुळे सुरु होतात. या राक्षसाला मारण्यासाठी स्वतः विष्णुंना आपले आरामदायी शेषासन सोडून शेवटी नृत्य करावे लागले. शरीराची हालचाल आणि मेहनत हा मधुमेहावरचा उत्तम ईलाज आहे आणि स्वतःच्या फायद्याचा विचार सोडून लोककार्यात आणि लोकसेवेत स्वतःला गुंतवून घेणे हे त्याचे अनुपान आहे. यामुळेच की काय सद्यःपरिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत असताना "पाणी वाचवा, पाणी साठवा, तळी खोदा' असे कार्यक्रम ठरवले जातात. म्हणजेच आयुर्वेदाच्या सिद्धांताप्रमाणे ही मेहनतीची कामे मधुमेह दूर हटवण्यास उपयोगी पडतात. तसेच वीर्य कमी होत असल्याने त्याची जपणूक करणे आणि गोड जास्ती खाण्याऐवजी गोड बोलणे आणि गोड संबंध ठेवणे हे अधिक उपयुक्त पडते.

मधुमेह या रोगात शरीराला आवश्‍यक असणारी शक्ती पुरवणारी साखर पेशींना मिळू शकत नाही. शरीरात बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या द्रव्यांमधली साखर शोषून घेण्याची क्रिया थांबते, म्हणजेच शरीर साखर स्वीकारत नाही. शरीराकडून साखर न स्वीकारली गेल्यामुळे ती मूत्रातून बाहेर पडते वा रक्‍तात साठते. त्यामुळे रक्‍ताला जडत्व येते, रक्‍त घट्ट होते. त्यातून उत्पन्न होतात अनेक रोग. एक तर रोगप्रतिकारशक्‍ती व दैनंदिन व्यवहाराला लागणारी शक्‍ती शरीराला मिळत नाही व दुसरे म्हणजे रक्‍तात राहिलेली साखर अनेक प्रकारच्या रोगांना व त्रासांना जन्म देते. त्यामुळे हा रोग अक्षरशः मनुष्याला पोखरून टाकणारा, मनुष्याच्या आयुष्याची राख-रांगोळी करणारा आहे.

त्यावरचा इलाज म्हणजे काही अंशी तरी पॅन्क्रियाज या इन्सुलिनचा पुरवठा करणाऱ्या अवयवाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करून, आयुर्वेदिक औषधे घेऊन रक्‍तातली काही साखर शरीरात ओढून घेतली जाईल अशी व्यवस्था करणे. पण इतर औषधांची बहुतेक वेळा रक्‍तात साठलेली साखर जाळून टाकून कमी करण्याकडे प्रवृत्ती असते व अशा उपाययोजनेमुळे शरीराला शक्‍ती मिळत नाहीच, फक्‍त रक्‍तातील साखरेमुळे होणाऱ्या विकारांना काही अंशी आळा बसतो. पण तरीही यामुळे जीवन सुरळीत चालते किंवा सुखरूप जगता येते असे म्हणता येत नाही. कारण रक्‍तात वाढलेल्या साखरेमुळे रक्‍त घट्ट व दूषित होते त्यामुळे रक्‍त शुद्ध करणाऱ्या संस्थेला अतिरिक्‍त काम करायला लागल्यामुळे व मूत्राशयांवर येणाऱ्या ताणामुळे होणारे रोग काही अंशी टळू शकत असले तरी एकूण मेंदूला व हृदयाला व संपूर्ण चेतासंस्थेला आवश्‍यक असणारी शक्‍ती न मिळाल्यामुळे हाता-पायाच्या संवेदना कमी होऊ शकतात, रक्‍तप्रवाह कमी झाल्यामुळे यौवनसंबंधामध्ये ताकद कमी पडायला लागते, स्मृतिनाश वा अल्झायमर्ससारखे त्रास होऊ शकतात, पचनक्रिया बिघडते, हृदयाचा विस्तार होतो, हृदय कमकुवत होते, मूत्राशयावर ताण येतो, रक्‍तदाब वाढू शकतो, हृदयविकार होऊ शकतो, असे नाना प्रकारचे विकार होतात. परंतु हे विकार अचानक न होता मध्ये थोडा वेळ मिळतो. आयुष्यात मिळालेले दिवस व ते उपभोगायला लागणारी शक्‍ती यांचे गणित मात्र व्यस्तच राहते. म्हणजे एक वर्ष व्यवस्थित जगण्याऐवजी माणूस दोन वर्ष जगला, पण कार्यक्षमता मात्र फक्‍त 50 टक्केच राहिली, अशा तऱ्हेने आयुष्य जगावे लागते.

साखर ही शरीराची आवश्‍यकता आहे. पण ती समजुतदारपणे स्वतःच्या शरीरात पचली जाईल इतक्‍या प्रमाणातच खाता येईल. बऱ्याच वेळा हट्टी मुले जेवत नाहीत, म्हणून काही आपण त्यांना उपाशी ठेवत नाही. "एक घास काऊचा, एक घास चिऊचा' म्हणून त्यांना आपण भरवतोच. त्याचे लक्ष चंद्राकडे लावून त्याच्या नकळत त्याला भरवावे लागते. "तुला नको आहे ना, मग रहा उपाशी' असे म्हटल्यास त्या मुलाचे थोड्या दिवसांनी काय होईल याचा वेगळा विचार करायची गरज नाही. तसेच आपल्या शरीराचे आहे. मूल का जेवत नाही, त्याच्या पोटात जंत झाले आहेत का, त्याच्या छातीत कफ झाला आहे का, जेवणात त्याला न आवडणाऱ्या वस्तू आहेत का, त्याच्या भुकेची वेळ वेगळी आहे का, त्याच्या आवडीचा एखादा गोड-तिखट पदार्थ दिल्यास तो नीट जेवेल का, असा विचार करून शेवटी त्या मुलाला जेवायला घालावेच लागते. तसेच मधुमेह झालेल्या व्यक्‍तीने शरीरात सहज पचणाऱ्या गोष्टींमधून शरीराला साखर मिळावी अशी योजना करून थोड्या तरी साखरेचे शरीरात परिवर्तन होईल हे पाहावेच लागेल. शरीराला साखरेपासून शंभर टक्के वंचित करून हे काम होणार नाही, तर शरीराला काही मर्यादेत थोडी साखर घेऊन शरीराला साखर पचायला शिकवणे हे पहिले काम आहे. अर्थात त्याबरोबरीने इतर अवयव शक्‍तिहीन होऊ नयेत यादृष्टीने त्यांना मजबूत करण्यासाठी किंवा मूत्राशयावर अधिक ताण येऊ नये म्हणून त्यांना अधिक शक्‍तिशाली करण्यासाठीही औषधे घ्यावी लागतात. तसेच रक्‍तात जमलेली साखर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. शरीराने साखर ओढून घ्यावी म्हणूनही काही औषधे द्यावी लागतात. पथ्य पाळत असताना कमी साखरेचे पदार्थ वर्ज्य करून चालत नाही तर पदार्थातली साखर शरीर सहजपणे ओढून घेऊ शकेल असे पदार्थ खाणे आवश्‍यक ठरते. कारण हा राक्षस मोठा व उन्मत्त आहे. नुसती औषधे खाऊन रक्‍तातली किती साखर जाळणार किंवा किती पचनशक्‍ती सुधारणार? म्हणून बरोबरीने शरीरात वीर्यवर्धन करणे, चालणे, योगासन, प्राणायाम या गोष्टी आवश्‍यक असतात.

मानसिक ताण या रोगाचे एक विचित्र गणित तयार करतो. जसजशी शक्‍ती कमी होईल तसतसा जीवनाचा आनंद लुटण्याची क्षमता कमी होते. कामामधली कार्यक्षमता कमी झाल्यामुळे मानसिक ताण वाढतो. मानसिक ताण वाढला की पचनशक्‍ती कमी होते, शक्‍तिव्यय होतो, शरीरात साखर ओढली जात नाही. पर्यायाने पुन्हा साखर वाढते. असे एक दुष्टचक्र तयार होते. एरवीही कुणाचा मानसिक ताण खूप वाढला किंवा एखादा मानसिक धक्का बसला तर तयार झालेल्या ताणामुळे शरीरात आळस वाढतो, शरीर मोडल्यासारखे वाटते, अंगात कणकण वाटते. मधुमेह्याच्या बाबतीत मानसिक ताण वाढणे म्हणजे भस्मासुराला मदत करण्यासारखेच आहे. तेव्हा ध्यान, स्वास्थ्यसंगीत याद्वारे नेटाने व श्रद्धेने मानसिक ताण कमी करण्याची योजना आखून मधुमेह्याची दिनचर्या ठरवावी लागेल.
अशा प्रकारे मधुमेहाच्या भस्मासुराचा निःपात करता येईल.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com