पंरपरा श्रीगणेश पूजेची

पंरपरा श्रीगणेश पूजेची

सुखकर्ता, दुःखहर्ता अशा श्रीगणेशाच्या उत्सवाचा आज पहिला दिवस. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले त्यामागचा प्रयोजन होते समाजप्रबोधन, जनजागृती, सार्वजनिक संघटन. आजही या गोष्टींचे महत्त्व टिकून आहे, बरोबरीने अजून एक महत्त्वाचा पैलू गणेशोत्सव साजरा करण्यामागे असतो आणि तो म्हणजे गणेशपूजनाच्या निमित्ताने आपले होत असणारे आरोग्य रक्षण. श्रीगणेशाची स्थापना होते त्या दिवसापासून ते गणेशविसर्जनापर्यंत घराघरात पूजा-अर्चा होते, आरती होते, नैवेद्य तयार केला जातो, श्रीगणेशाला दाखविल्यानंतर घरातला प्रत्येक जण तो प्रसाद म्हणून सेवन करत असतो. या सगळ्या गोष्टी रीतिरिवाज म्हणून, परंपरेचा एक भाग म्हणून केल्या जातात. परंतु जर त्यातील शास्त्र जपले, पावित्र्य राखले तर त्यातून आपल्या आरोग्याला उत्तम हातभार लागत असतो. कसे ते आज आपण पाहूया. 

गणपतीला दूर्वा प्रिय असतात हे आपण जाणतो. दूर्वा हे एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे. दूर्वांच्या नुसत्या संपर्कात राहण्याने, दूर्वा हाताळल्यानेसुद्धा आरोग्यावर उत्तम परिणाम होत असतात. म्हणूनच आयुर्वेदात गर्भधारणा व्हावी व गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे म्हणून स्त्रीच्या व गर्भवतीच्या आसपास ज्या वनस्पती असाव्यात म्हणून सांगितल्या आहेत, त्यात दूर्वांचा उल्लेख आहे. दूर्वा थंड असतात, रक्‍तदोष दूर करतात, भूतबाधा म्हणजे अदृश्‍य जीवजंतूंना दूर ठेवतात. उष्णतेमुळे नाकातून रक्‍त येते, त्यासाठी दूर्वांचा रस नाकात घालण्याचा उपयोग होतो. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास पित्त कमी होते, रक्‍त शुद्ध होते, अनेक त्वचाविकार, नागीण वगैरे त्रास दूर होऊ शकतात. संगणकासमोर बसण्याने डोळ्यांची आग होत असल्यास दूर्वांचा रस घेण्याचा उपयोग होतो. दूर्वांच्या हिरवळीवर अनवाणी पायाने चालण्यानेही डोळ्यांची ताकद वाढते, डोळ्यांवरचा ताण कमी होतो. नागीण उठल्यामुळे असह्य दाह होत असेल तर दूर्वांच्या रसात तांदूळ वाटून त्याचा लेप करण्याने आराम वाटतो. उष्णतेमुळे उलट्या होत असल्या, पित्त पडत असले, तर तांदळाच्या धुवणात दूर्वा वाटून त्याचा काढलेला रस आणि खडीसाखर हे मिश्रण घेण्याचा फायदा होतो. लघवीला थेंब थेंब होत असेल, आग होत असले तर दूर्वांचा रस घेण्याने लघवी साफ होते, लघवीचा गडद किंवा तांबडा रंगही नाहीसा होतो. अग्नीच्या संपर्कात काम करावे लागणाऱ्यांनी, सध्याच्या काळात संगणकावर तास न्‌ तास काम करावे लागणाऱ्यांनी किंवा प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांनी दूर्वांचा रस खडीसाखर घालून घेणे हितावह असते. 

गणपतीच्या पूजेत अवश्‍य असते ते म्हणजे लाल रंगाचे जास्वंदीचे फूल. ताजे जास्वंदीचे फूल मनाला प्रसन्न करतेच, पण देवाला वाहायच्या निमित्ताने बागेत, बाल्कनीत जास्वंदीचे झाड लावलेले असले की त्याच्या पानाफुलांचा आरोग्यरक्षणासाठी उपयोग करून घेता येतो. जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावली असता केसांची वाढ होते व अकाली केस पांढरे होणे टळू शकते. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो. जास्वंदीच्या कळ्या (शक्‍यतो पांढऱ्या जास्वंदीच्या) तुपात तळून त्यात खडीसाखर, नागकेशर मिसळून घेण्याने मूळव्याधीमुळे रक्‍त पडणे थांबते. स्त्रियांना अंगावरून पांढरे अधिक प्रमाणात जाण्याचा त्रास असेल तर जास्वंदीचे मूळ दुधात उगाळून, त्यात थोडी खडीसाखर घालून दिवसातून दोनदा घेण्याने बरे वाटते. पुरुषांमध्ये लघवीवाटे धातू जातो, त्यावरही जास्वंदीच्या मुळ्या व पांढऱ्या सावरीची साल यांचे समभाग चूर्ण सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घेण्याने गुण येतो. वाढलेले पित्त कमी करण्यासाठी सात दिवस रोज जास्वंदीच्या पानांचा तीन-चार चमचे रस साखर मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

श्री गणेशाला केवड्याचे पान आणि फूल अर्पण करण्याचीही पद्धत आहे. केवडा अतिशय सुगंधी असतो. केवडा वात, कफनाशक तसेच विषाचा प्रभाव नाहीसा करणारा असतो. केवड्याचे झुडूप पसरू लागले की त्याला पारंब्या फुटतात. या थंड, देहाला दृढ करणाऱ्या आणि रसायन गुणांनी युक्‍त असतात. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून अधिक जात असल्यास केवड्याची मुळी पाण्यात उगाळून खडीसाखरेबरोबर घेण्याचा उपयोग होतो. अंगात उष्णता वाढली असेल तर केवड्याच्या पातीच्या रसात जिरे पूड आणि साखर मिळून आठवड्यासाठी घेण्याचा फायदा होतो. या दिवसात पथ्य नीट सांभाळणे आवश्‍यक असते. प्रमेहामध्ये केवड्याचे मूळ वाफवून काढलेला रस आणि साखर एकत्र करून घेण्याचा उपयोग होतो. 

निळ्या-जांभळ्या फुलांची व पांढऱ्या फुलांची असे रुईचे दोन भेद असतात. पोटात वायू होऊन पोट फुगते, दुखते अशा वेळी रुईच्या पानांना किंचित एरंडेल लावून गरम करून पोटावर शेक केला जातो. यामुळे वायू सरतो व बरे वाटते. छातीत कफ झाला असता रुईच्या पानांचा याप्रकारे शेक करणे हितावह असते. वातामुळे अंग ठणकत असल्यास रुईच्या पानांचा शेक केल्याने बरे वाटते. रुईची फुले दम्यासाठी उत्तम असतात. 

गोकर्णीची पाने-फुले गणपतीला वाहिली जातात. निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची गोकर्णाची फुले आकाराने खरोखरच गाईच्या कानासारखी दिसतात. पांढरी गोकर्ण अधिक औषधी समजली जाते. डोके दुखत असल्यास पांढऱ्या गोकर्णीचे मूळ पाण्यात उगाळून तयार केलेले गंध नाकात घालण्याचा उपयोग होतो. अर्धशिशीचा त्रास होत असल्यास त्यावर पांढऱ्या गोकर्णीच्या बिया आणि मूळ एकत्र वाटून तयार केलेला लेप दुखणाऱ्या जागी करण्याचा उपयोग होतो. गर्भपात होऊ नये यासाठी पांढऱ्या गोकर्णीचे मूळ दुधात उगाळून घेत राहणे हितावह असते. गोकर्णीची वेल विषनाशक तसेच पुष्ट शक्‍तीचा प्रभाव नाहीसा करणारी असते, असे आयुर्वेदाच्या ग्रंथात उल्लेख सापडतात.

डाळिंबाची फुले व पाने हीसुद्धा गणपतीला वाहिली जातात. डाळिंबाचे फळ पित्तनाशनासाठी प्रसिद्ध असतेच, परंतु डाळिंबाची फुले पाने सुद्धा औषधी असतात. नाकातून रक्‍त पडण्याचा त्रास असता डाळिंबाच्या फुलांचा रस नाकात टाकण्याचा उपयोग होतो. डोळे आले असता डाळिंबाची पाने बारीक करून बंद डोळ्यांवर लेपाप्रमाणे लावली जातात.

गणेशस्थापना होते त्या दिवशी तसेच नंतरही जितके दिवस श्रीगणेश घरी असतात, तितके दिवस रोज त्यांना नैवेद्य दाखवला जातो व प्रसाद म्हणून घरातील सर्वांना, मित्रमंडळींना वाटला जातो. यात उकडीचे मोदक अग्रस्थानी असतात. पाठोपाठ खोबऱ्याचे लाडू किंवा वड्या, करंजी, तांदळाची खीर, पातोळी यासारखे पदार्थ करण्याची परंपरा असते. या सर्वांमधली घटकद्रव्ये पाहिली तर त्यात नारळ, गूळ किंवा साखर, तांदूळ, वेलची वगैरेंचा समावेश असते. गणपती बसतात तो ऋतुकाळ पाहिला, त्या काळात आपली पचनशक्‍ती कशी असते हे लक्षात घेतले तर ही योजना आपल्या ऋषिमुनींनी किती विचारपूर्वक केलेली आहे हे लक्षात येते. भाद्रपद महिना म्हणजे ऐन पावसाळ्यामध्ये दिवस. पावसाळ्यात शरीरातील वातदोष प्रकुपित झालेला असतो. तसेच पचनशक्‍ती मंदावलेली असते. बरोबरीने पित्तदोष शरीरात साठायला सुरुवात झालेली असते. अशा वेळी खवा, बासुंदी, श्रीखंड किंवा तळून केलेले गोड पदार्थ, गव्हापासून तगारे केलेली मिष्टान्ने पचणे अवघड ठरू शकते. म्हणून श्रीगणेशाला वात-पित्तशामक, पचण्यास सोपी, तळण्याऐवजी वाफवून तयार केलेली पक्वान्ने नैवेद्य म्हणून दाखवायची प्रथा आहे. 

नारळाचे फळ चवीला गोड असते, गुणांनी स्निग्ध व गुरु असते तर शीत वीर्याचे असते, पित्तदोषाचे शमन करते, ताकद वाढवते, मांसधातूचे पोषण करते, हृदयाला हितकर असते व मूत्राशयाची शुद्धी करते. याखेरीज स्निग्ध गुणाचे असल्याने नारळ वातदोषाचे शमन करतो व प्राकृत कफाचे पोषण करते. या सर्व गुणांमुळे नारळ वर्षाऋतूत आरोग्यदायी असतो. 

तांदूळसुद्धा चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, पचण्यास सोपे असतात तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात. गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्निदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करून मन शांत करतो, श्रम नाहीसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता, प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो. गूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणाराही असतो. 

गुळाऐवजी साखर वापरली तरी चालते, चांगल्या प्रतीची साखर स्निग्ध असते, थंड असते, वात-पित्तशामक असते, साखरेमुळे ताकद वाढते, शुक्रधातूचे पोषण होते, साखरेमध्ये सारक गुणधर्म असतो. साखर क्षयरोग, खोकला, तृष्णा, विषदोष व मद्यपानामुळे होणारे रोग, दमा, मूर्च्छा, चक्कर, जुलाब, रक्‍तदोष, मूळव्याध यावर औषधाप्रमाणे हितकर असते.

अशा प्रकारे गणेशोत्सवातील रूढी-परंपरेच्या मागचे तत्त्व समजून घेतले, विज्ञान समजून घेतले तर त्या पाळणे सोपे होईल, शिवाय त्यामुळे आरोग्यरक्षणासही मदत मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com