#FamilyDoctor अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

Yoga
Yoga

बुद्धीचे ऐकायचे की नाही, हे मनाच्या शक्‍तीवर अवलंबून असते. मनाने घेतलेला निर्णय इंद्रियांना पाळावाच लागतो. म्हणून आयुर्वेद, योग, अध्यात्म वगैरे सर्व प्राचीन शास्त्रांमध्ये मनाच्या सकारात्मकतेवर मोठा भर दिलेला आढळतो. 

शक्‍तीचा विचार न करता भलतेच साहस करणे, हे प्राणाचा नाश करणाऱ्या कारणात श्रेष्ठ असते, हे आपण मागच्या वेळी पाहिले. यापुढे चरकाचार्य सांगतात, विषादो रोगवर्धनम्‌ - मनाची उदासीनता, नकारात्मकता, ही रोग वाढवण्यामध्ये प्रमुख असते. 

‘मन एव मनुष्याणाम्‌’ म्हणजे मनुष्यावर मनाचा प्रभाव सर्वाधिक असतो. कारण निर्णय घेण्याचे अखेरचे काम मन करते. काम करणारी इंद्रिये असतात, चांगले काय, वाईट काय, हे सांगणारी बुद्धी असते; मात्र बुद्धीचे ऐकायचे की नाही, हे मनाच्या शक्‍तीवर अवलंबून असते. मनाने घेतलेला निर्णय इंद्रियांना पाळावाच लागतो. म्हणून आयुर्वेद, योग, अध्यात्म वगैरे सर्व प्राचीन शास्त्रांमध्ये मनाच्या सकारात्मकतेवर मोठा भर दिलेला आढळतो. 

चरकाचार्य म्हणतात, विषाद रोग वाढविण्यात सर्वश्रेष्ठ असतो. जोपर्यंत मन निरोगी राहण्याचा निर्णय घेत नाही किंवा रोगातून बाहेर पडायचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत नुसत्या औषधांनी, उपचारांनी रोगावर काम करता येत नाही. अनुशासन, दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम वगैरे श्वसनक्रिया, संगीत, ॐकार, मंत्रश्रवण,  ध्यान वगैरेंच्या मदतीने मनाची सकारात्मकता वाढवता येते व त्याच्या मदतीने रोगातून पूर्ण बरे होणेसुद्धा शक्‍य होते. 

स्नानं श्रमपहराणाम्‌ - स्नान हे श्रम दूर करण्यात श्रेष्ठ असते. 
आयुर्वेदाने स्नानाचे फायदे सांगताना म्हटले आहे, 
दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ ।
कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्‌-दाहपाप्मजित्‌ ।।
स्नानामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्‍ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि नकारात्मकता कमी होते. 

तदेवोष्णेन तोयेन बल्यम्‌।
अर्थात, गरम पाण्याने स्नान केले असता शरीरबल वाढते; परंतु डोक्‍यावरून कधीही कढत पाणी घेऊ नये. कारण डोक्‍यावर खूप गरम पाणी घेतल्यास डोळ्यांची शक्‍ती कमी होते व केसांना हानी पोचते. म्हणून खांद्यावरून आपणास आवडेल, सोसवेल असे गरम पाणी घेतले, तरी डोक्‍यावरून मात्र कोमट पाणीच घ्यावे. शरीरशुद्धीसाठी व ताजेतवाने होण्यासाठी स्नान अनिवार्य आहेच. मात्र, जेवल्यानंतर लगेच स्नान करू नये. स्नानानंतर स्वच्छ व उत्तम वस्त्रे परिधान करावीत.

श्रम दूर होण्यासाठी स्नान करताना उटणे वापरणे अधिक लाभदायी ठरते. उटणे सुगंधी, वातशामक वनस्पतींपासून बनविलेले असल्याने उटणे लावून कोमट पाण्याने स्नान करणे हे वात कमी करण्यासाठी, श्रम कमी करण्यासाठी उत्तम असते. 
नियमित उटणे लावण्याचे फायदे सांगताना वाग्भट म्हणतात, 
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌।
स्थिरीकरणमङ्‌गानां त्वक्‍प्रसादकरं परम्‌ ।। 
उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात. त्वचा रुक्ष असल्यास उटणे तेलाबरोबर मिसळून वापरता येते, त्वचा तेलकट असल्यास नुसत्या पाण्यात मिसळून लावता येते. उटणे नियमित लावण्यामुळे अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते आणि उटण्यात असणाऱ्या सुगंधी द्रव्यांमुळे सर्वांगाला मंद सुवास येत राहिल्याने मनही प्रसन्न होते. 

अग्र्यसंग्रहातील यापुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com