अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

वेग रोखला की वातदोष उद्‌भवतो आणि आजाराला निमंत्रण मिळते. म्हणून जांभईसह कोणताही वेग रोखता नये.
वेग रोखला की वातदोष उद्‌भवतो आणि आजाराला निमंत्रण मिळते. म्हणून जांभईसह कोणताही वेग रोखता नये.

शारीरिक वेग अडवू नयेत, तसेच बळजबरीने प्रवृत्त करू नयेत हे आयुर्वेदात अनेक वेळा सांगितलेले आहे. मूत्रप्रवृत्तीची संवेदना अथवा मलप्रवृत्तीची भावना होणे यांसारखे सर्वच वेग वात निर्माण करत असतात. त्यामुळे ते अडवले तरी वात बिघडतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त केले तरी वात बिघडतो. एकदा का वात बिघडला, की आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही.

मागच्या आठवड्यात आपण तृप्तीचा अनुभव घेण्यासाठी आहार सर्वश्रेष्ठ असतो हे पाहिले. आता अग्र्यसंग्रहातील यापुढची माहिती घेऊ.
वेगधारणम्‌ अनारोग्यकराणाम्‌ - वेग (नैसर्गिक आवेग) जबरदस्तीने अडवून धरणे हे रोगाचे मुख्य कारण होय. 

शारीरिक वेग अडवू नयेत, तसेच बळजबरीने प्रवृत्त करू नयेत हे आयुर्वेदात अनेक वेळा सांगितलेले आहे. ‘वेग’ या शब्दावरूनच एक गोष्ट लक्षात येते, की वेग हे वाताशी संबंधित असतात. मूत्रप्रवृत्तीची संवेदना निर्माण होणे, मलप्रवृत्तीची भावना होणे वगैरे सर्वच वेग वात निर्माण करत असतो. त्यामुळे ते अडवले तरी वात बिघडतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त केले तरी वात बिघडतो. एकदा का वात बिघडला, की आरोग्य बिघडायला वेळ लागत नाही. 
रोगाः सर्वेऽपि जायन्ते वेगोदीरणधारणैः ।
....अष्टांगहृदय सूत्रस्थान
वेगधारण किंवा वेग उदीरण (जबरदस्तीने प्रवृत्ती) केल्याने सर्व प्रकारचे रोग होऊ शकतात.

निदानस्थानात म्हणजे ज्या ठिकाणी रोगाची कारणे, रोगाची लक्षणे, रोग होतो म्हणजे शरीरात नेमके काय बदल होतात, काय बिघाड होतात वगैरे विषयांची माहिती दिलेली आहे, तेथेही बहुतेक सर्व रोगांच्या कारणांच्या यादीमध्ये ‘वेगधारण’ याचा अंतर्भाव केलेला आढळतो. चरकसंहितेमध्ये तर एक संपूर्ण अध्याय फक्‍त वेगधारण या विषयाला वाहिलेला आहे. याचे नाव ‘न वेगान्‌ धारणीयम्‌’ असे आहे. यात अगदी सुरवातीला चरकाचार्य म्हणतात, ‘स्वतःच्या प्रकृतीला हितकर आहार सेवन केल्यानंतर त्याचे पोटात नीट पचन झाल्यानंतर, त्यातील सार अंशाने शरीरातील रस-रक्‍तादी धातूंचे पोषण झाले व उरलेला मलभाग मल-मूत्ररूपाने शरीराबाहेर निघून गेला की आरोग्य टिकून राहते. मात्र मल-मूत्रादी वेगांचे धारण केले, तर हितकर आहार-आचरण करूनही आरोग्य चांगले राहू शकत नाही.’ 
न वेगान्‌ धारयेत्‌ धीमान्‌ जातान्‌ मूत्रपुरीषयोः ।
न रेतसो न वातस्य च च्छर्द्याः क्षवथोर्न च ।।
नोद्गारस्य न जृम्भाया न वेगान्‌ क्षुत्पिपासयोः ।
न बाष्पस्य न निद्राया निःश्वासस्य श्रमेण च ।।
...चरक सूत्रस्थान

मूत्र, मल, वीर्य, अधोवायू, उलटी, शिंक, ढेकर, जांभई, भूक, तहान, अश्रू, झोप, श्रमाने लागलेला दम हे तेरा वेग अडवू नयेत किंवा मुद्दाम प्रवृत्त करू नयेत.

मूत्राचा वेग अडविल्याने बस्तीच्या ठिकाणी किंवा मूत्रद्वाराच्या ठिकाणी वेदना होतात, मूत्रप्रवृत्ती अडखळत होते, मनुष्याला वाकून बसावेसे वाटते, डोके दुखू शकते. 

मलप्रवृत्तीचा वेग अडविल्याने मलाशय, मोठ्या आतड्याच्या ठिकाणी वेदना होतात, डोके दुखते, वायू सरणे बंद होते तसेच मलही साठून राहतो, पोटऱ्यांमध्ये गोळे येतात, पोटात गुडगुड आवाज येतो.

वीर्याचा वेग अडविल्याने लिंग किंवा वृषणाच्या ठिकाणी वेदना होतात, अंग दुखते, हृदयाच्या ठिकाणी दुखते, मूत्रप्रवृत्ती थांबून थांबून होते.

अधोवायूचा वेग अडविल्याने मल तसेच मूत्राचाही वेग अडतो, पोटात गुडगुड होते, विनापरिश्रम थकवा जाणवतो, पोटात दुखते व अन्य वातसंबंधी रोग होतात. 

उलटीचा वेग अडविल्याने अंगावर खाज येते. पित्ताच्या गांधी उठतात, जेवणात रुची वाटत नाही, मळमळते. विविध त्वचारोग, पांडुरोग, सूज, ताप येऊ शकतो.

शिंकेचा वेग अडविल्यास डोके दुखते, मान जखडू शकते, चेहरा वाकडा होऊ शकतो. अर्धशिशीचा त्रास होतो, ज्ञानेंद्रिये अशक्‍त होतात.

ढेकर येणे थांबवले असता उचकी लागते, अकारण दम लागल्यासारखे वाटते, जेवणाची इच्छा होत नाही, छाती जखडल्यासारखी वाटते, कंप सुटतो. 

जांभई अडवली तर कानात आवाज येतात, शरीरावयव बधिर होऊ शकतात, हाता-पायांना कंप सुटू शकतो, झटके येऊ शकतात. 

भूक लागलेली असतानाही काही न खाल्ल्यास शरीर कृश होते, ताकद कमी होते, शरीराचा वर्ण बदलतो, शरीर दुखते, जेवावेसे वाटत नाही, चक्कर येते.

तहान लागली असता पाणी न प्यायल्यास घसा व तोंड कोरडे होते, बाधीर्य येऊ शकते, थकवा जाणवतो. गळून गेल्यासारखे वाटते, छातीत दुखू शकते. 

अश्रूंचा वेग अडविल्यास सर्दी होते, नेत्ररोग होतात, हृदयरोग होऊ शकतो, जेवणाची इच्छा होत नाही, चक्कर येतात.

झोप येत असतानाही जबरदस्तीने जागे राहिल्यास जांभया येतात, अंग दुखते. डोळ्यांवर झापड येते. शिरोरोग होऊ शकतात, एकाग्रता करणे जड जाते, डोळे जड होतात. 

भरभर चालण्याने किंवा पळल्याने काही वेळापुरता दम लागतो. हा दम लागणे दाबल्यास गुल्मरोग होऊ शकतो, हृदयरोग तसेच मूर्च्छा येऊ शकते. 
म्हणून आरोग्य टिकवायचे असेल तर वेग अडवून न ठेवणे किंवा जबरदस्तीने प्रवृत्त न करणे या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com