कागली (रवांडा) (पीटीआय) : 'जगभरात अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय त्यांच्या कर्तृत्वामुळे भारताची मान उंचावत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. भारत आणि रवांडा यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्येही येथील भारतीय समुदायाच्या सकारात्मक प्रभावाचा मोठा वाटा आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आफ्रिकेमधील रवांडा देशाच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यानंतर आज ट्विटरद्वारे त्यांनी याबाबत माहिती दिली. "जगभरात भारतीय आपली ओळख निर्माण करत आहेत. रवांडामधील भारतीयांनीही असेच कर्तृत्ववान ओळख निर्माण केली असल्याचे येथील अध्यक्षांनी मला सांगितले. जगभरातील भारतीय हे आपल्या देशाचे राष्ट्रदूत आहेत,' असे मोदी यांनी सांगितले. या देशात भारतीय उच्चायुक्त स्थापन करण्याची येथील भारतीयांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचेही मोदी म्हणाले.
तत्पूर्वी, मोदी यांनी रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर विविध आंतरराष्ट्रीय आणि द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. 1994 मध्ये रवांडामध्ये झालेल्या सामूहिक हत्याकांडात बळी गेलेल्या अडीच लाख जणांच्या स्मृतीनिमित्त बांधण्यात आलेल्या स्मारकालाही मोदी यांनी आज भेट दिली. यानंतर मोदी युगांडा देशाकडे रवाना झाले.
मोदींकडून गोदान
रवांडा सरकारच्या "गिरिंका' अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज येथील वेरु गावातील दोनशे जणांना गाई भेट दिल्या. या अभियानाचे मोदी यांनी कौतुक केले. आर्थिक सबलीकरणासाठी गाईंना इतके महत्त्व दिले जात असल्याचे पाहून भारतीय नागरिक खूश होतील, असेही मोदी यावेळी म्हणाले. या अभियानामुळे रवांडामधील ग्रामीण भागाचे सकारात्मक रुपांतर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.