इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेला दहशतवादी हल्ला (26/11) पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच घडविल्याची कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमुद अली दुराणी यांनी दिली आहे. मात्र या हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा कोणताही सहभाग नव्हता, असा दावाही दुराणी यांच्याकडून करण्यात आला आहे.
दुराणी हे नवी दिल्लीमधील एका थिंक टॅंकने आयोजित केलेल्या आशियाई सुरक्षा परिषदेस संबोधित करत होते.
''26/11 चा दहशतवादी हल्ला हे सीमेपलीकडील दहशतवादाचेच उदाहरण आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनीच हा हल्ला घडविला. परंतु, पाकिस्तानमधील सरकार वा "आयएसआय'चा यामध्ये कसलाही सहभाग नव्हता, याची मला 100% खात्री आहे,'' असे दुराणी म्हणाले.
पाकिस्तानमधील जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याच्याविषयीही दुराणी यांना यावेळी विचारणा करण्यात आली. यावर, "सईद याचा पाकिस्तानला काहीही उपयोग नसून त्याला शिक्षा व्हावयासच हवी,' असे मत दुराणी यांनी व्यक्त केले.
|