बीजिंग - भारतीय बाजारात स्मार्टफोन जगतात 40 टक्क्यांपर्यंत चिनी कंपन्यांचा ताबा असल्याचे एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सन 2016 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सॅमसंगनंतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कंपनीमध्ये लिनोव्हो कंपनीच्या स्मार्टफोनचा खप आहे.
चीनमधील चायना डेली या जागतिक संशोधन कंपनीने याबाबत सर्वेक्षण केले होते. भारतात मागील वर्षी चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी एकूण 40 टक्के बाजारावर ताबा मिळविला आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन बाजार आहे.
"चायना डेली'च्या सर्वेक्षणानुसार सॅमसंग आणि लिनोव्हानंतर शाओमीची विक्री सर्वाधिक आहे. भारतातील 30 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांची भारतीय बाजारात 40 टक्के हिस्सेदारी झाली आहे. या अहवालानुसार चिनी कंपन्यांच्या या भारतीय बाजारावरील वर्चस्वामुळे देशी स्मार्टफोन कंपन्यांना मात्र फटका सहन करावा लागत आहे. ऑक्टोबरमध्ये मायक्रोमॅक्सच्या विक्रीत 16.7 टक्क्यांची घट झाली आहे.
या सर्व्हेनुसार भारतीय ग्राहक चिनी ग्राहकांच्या तुलनेत किमतीच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्याचे मानले जात आहे. भारतीय बाजारात स्मार्टफोनची सरासरी किंमत 100 डॉलरच्या (साडे सहा हजार रुपये) दरम्यान आहे.
|