इस्लामाबाद - नियंत्रण रेषेवरील भारतीय जवानांच्या विनाकारण गोळीबारावरून पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंह यांना समन्स पाठविले. पाकच्या परराष्ट्र विभागाने सांगितले, की महासंचालक (दक्षिण आशिया) महम्मद फैसल यांनी सिंह यांना पाचारण करताना 1 मार्चला भीमबेर/समाहिती सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराची निंदा केली. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी आणि मुलगा जखमी असल्याचेही सांगण्यात आले.
फैसल म्हणाले, की शांततेच्या आव्हानानंतरही भारत सातत्याने शस्त्रसंधीचा भंग करत आहे. 2018मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषा आणि सीमेवर 415वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये 20 नागरिक मारले गेले असून, 71 जण जखमी झाले आहेत.
|