कोलंबो : मुसळधार पावसाने श्रीलंकेला जोरदार तडाखा दिला असून, पूर आणि भूस्खलनामुळे गेलेल्या बळींची संख्या 55 वर पोचली आहे.
गुरुवारपासून श्रीलंकेच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, पुराचा फटका सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे 55 जण मृत्युमुखी पडले असल्याचे सांगण्यात आले. अनेक नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत असून, त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आला आहे.
पूरस्थितीचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पोचविण्यासाठी श्रीलंकेच्या हवाई दलासह नौदलाची मदत घेतली जात आहे. श्रीलंकेत मागील वर्षी पूर आणि भूस्खलनामुळे शंभर जण मृत्युमुखी पडले होते.
|