जळगाव : राज्य शासनाने महापालिकेला दिलेल्या ४२ कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्याच्या कामाला बुधवार (ता. १)पासून प्रारंभ झाला. टॉवर चौक ते अजिंठा चौफुली रस्त्याच्या लेव्हलचे काम मशिनरीच्या साहाय्याने करण्यात आले.
जळगाव शहरातील सर्वच भागांतील रस्ते खराब झाले आहेत. मुख्य रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविणेही कठीण झाले आहे. याशिवाय पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावर चालणेही दुरापास्त होणार आहे. अशास्थितीत शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी नगरसेवकांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची ही मागणी मान्य करून महापालिकेला ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, या निधीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांबाबत कागदारवर अधिकच वाद झाले. त्यामुळे त्यातून कामे करण्यास विलंब झाला. यामुळे या निधीतून रस्त्याच्या कामाला सुरवात होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
अखेर सुरवात
महापालिकेने शहरातील चार रस्ते करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजुरी दिली आहे. त्यातील टॉवर चौक ते अजिंठा चौफुली रस्ता आहे. या रस्त्यावरचे अमृत योजना व इतर कामही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करावे, असे पत्र महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मक्तेदार श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांना कामाचे आदेश दिले होते.
लेव्हलींग नंतर बीएम कारपेट
बुधवारी दुपारपासून कामास मक्तेदाराने सुरवात केली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सागंण्यात आले. या रस्त्यावरील खड्डे प्रथम भरून घेण्यात येतील. त्याची संपूर्ण लेव्हल करण्यात येईल. त्यानतंर बीएम कारपेट टाकून सीलकोट करण्यात येईल. आता खड्डे भरण्यासाठी इलेक्ट्रीक झाडूने त्याची साफसफाई करण्याचे काम सुरू झाले आहे. दिवसा वाहतूक असल्याने अडथळा येत आहे. मात्र, रात्री त्याचे काम वेगाने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश
शासनाच्या ४२ कोटींच्या निधीतील कामाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ‘सकाळ’ने वृत्ताच्या माध्यमातून त्याबाबत पाठपुरावा केला होता. प्रत्येक पातळीवर महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचणीची माहिती घेऊन वृत्त प्रकाशित केले होते. जळगावकरांना पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्ते तरी खड्डेमुक्त मिळावेत, हाच त्या मागचा उद्देश होता. अखेर त्या पाठपुराव्या यश आले आणि अखेर या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला.
''महापालिकेकडून आमच्याकडे शासकीय निधीनुसार ज्या रस्त्यांची कामे सूचविली आहेत. त्यानुसार आम्ही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मक्तेदाराकडून करून घेणार आहोत. पाऊस सुरू झाला, तरी मोकळीक मिळेल त्यानुसार काम करण्यात येईल. हे काम लवकरात लवकर करण्यासाठी आमचा पाठपुरावा असेल.'' - गिरीश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.