जळगाव : खरीपाच्या तोंडावर बोगस बी. टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतकऱ्यांना फसविण्यासाठी परराज्यातील कंपन्या बोगस बियाणे विक्रीस आणत असल्याचे कृषी विभागाने आज टाकलेल्या छाप्यांतून दिसून येते. तीन दिवसात हा दुसरा छापा कृषी विभागाने टाकून ५० पाकीटे बोगस बी. टी. बियाणे जप्त केले आहे. गेल्या बुधवारी (ता. ८) कृषी विभागाने शिरसोली (ता. जळगाव) येथे बोगस बी. टी. बियाणे जप्त केले होते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्यता नसलेले एचटीबीटी कापूस बियाणे राजेंद्र धोंडूसिंह राजपूत (रा. कळंबु, ता. अमळनेर) यांच्या गोडावूनमध्ये असल्याची जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अरूण तायडे, अमळनेरचे कृषी सहाय्यक गणेश पाटील, विद्या पाटील, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे यांच्या मदतीने सापळा रचून राजपूत यांच्या गोडावूनवर छापा टाकून बोगस कापूस बियाण्यांची ५० पाकिटे जप्त केली. त्याची किंमत ६२ हजार पाचशे रुपये आहे. राजपूत यांच्याविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा छापा तंत्र अधिकारी संजय शेवाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे याच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आला.
बियाणे खरेदीची बिले घ्या
खरीप हंगाम २०२२ मध्ये अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विनाबिलाने खरेदी करू नये. या बियाण्यांची कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी लागवड करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास ८४६८९०९६४१, ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.