मधमाश्‍यांमुळे शेती उत्पादनात भरघोस वाढ

 honey bees production
honey bees production

बारामती -  मधमाश्‍यांमुळे एकरी उत्पादनात 30 टक्‍क्‍यांची वाढ होते, हे पटवून देणारा प्रयोग बारामतीत यशस्वी झाला आहे. येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व क्रॉप लाइफ इंडियाच्या सहकार्याने "मधुसंदेश' प्रकल्पाच्या माध्यमातून मधमाश्‍यांच्या वापराने डाळिंबाचे सरासरी एकरी 37 टक्के; तर कांद्याच्या उत्पादनात सरासरी 17.8 टक्‍क्‍यांनी उत्पादन वाढले आहे.

दुसरीकडे याच प्रकल्पामुळे एका वर्षाकाठी होणाऱ्या रासायनिक फवारण्यांमध्येही घट झाली असून, सरासरी 8 फवारण्या कमी झाल्याचेही सिद्ध झाले आहे.

आज शारदानगर येथे "परागीभवन दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राने आज भारतीय कृषी अनुसंधान परिषद, क्रॉप लाइफ इंडिया व राहुरी कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्याच्या चार तालुक्‍यांमध्ये राबविलेल्या "मधुसंदेश' या प्रकल्पातील यशाची आकडेवारी जाहीर केली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे प्रकल्प समन्वयक डॉ. आर. के. ठाकूर, राहुरी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, क्रॉप लाइफ इंडियाचे डॉ. जोन्स व विपीन सैनी यांच्या उपस्थितीत "केव्हीके'चे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली यांनी मधमाश्‍यांच्या वास्तव्यामुळे मिळालेले कृषिक्रांतीचे शुभसंकेत आकडेवारीसह मांडले.

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने गेल्या दोन वर्षांत बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या चार तालुक्‍यांतील 34 गावांमध्ये हा प्रयोग 149 डाळिंब उत्पादक व 34 कांदा उत्पादकांच्या शेतात राबविला. या शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी मधमाश्‍यांच्या 250 पेट्या पुरवल्या. तसेच, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले. यामध्येच त्यांनी रासायनिक औषधांऐवजी जैविक औषधांच्या फवारण्या कराव्यात, असा सल्ला दिला. याचा परिणाम म्हणजे या डाळिंब उत्पादकांचे एकरी सरासरी उत्पादन 6.22 टनांवरून 8.39 टनांवर पोचले, सरासरी 18 फवारण्या कमी झाल्या. या पूर्वीच्या अनुभवानुसार 4.97 लाखांवरून उत्पन्न 6.70 लाखांपर्यंत वाढले, शिवाय फळांचे सेटिंग जे 90 दिवसांपर्यंत व्हायचे, ते 40 दिवसांवर आले. कळीगळ थांबली. कांदा बी उत्पादकांच्या बाबतीतही तसाच अनुभव आला. अगोदर जिथे एकरी 388 किलो कांद्याचे बीजोत्पादन मिळत होते, ते 455 किलोवर पोचले. तेथेही औषधाच्या फवारण्या कमी झाल्या. उत्पादनाचा दर्जाही चांगला उंचावला.

या प्रकल्पाचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, यापुढील काळात हा प्रकल्प अधिक वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com