अर्थसंकल्पातून सिंधुदुर्गला 25 कोटी  - दीपक केसरकर

अर्थसंकल्पातून सिंधुदुर्गला 25 कोटी  - दीपक केसरकर

सावंतवाडी - जिल्हा नियोजनाचे बजेट 130 कोटींवरून आता 160 कोटीवर नेले आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोट्यवधीचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. जिल्हावासीयांना विश्‍वासात घेऊनच तो खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. 

जिल्हा स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे 25 कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. यातून सिंधुदुर्गनगरी मुख्यालयातील सुविधांत वाढ करण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. 

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जिल्हा आणि विशेषत: कोकणासाठी केलेल्या तरतुदीची माहिती देण्यासाठी श्री. केसरकर यांनी आपल्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, ""आपण जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विकास केद्रबिंदू मानून अनेक योजना जाहीर केल्या आहेत. कर्जमाफीबाबत राज्य आणि केंद्र शासन योग्य तो निर्णय जाहीर करणार आहे; परंतु शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यात कृषी पंपासाठी 979 कोटी, पाणी पुरवठ्यासाठी 8,233 कोटी, सामूहिक शेतीसाठी प्रोत्साहन, त्यातून दहा एकरच्या वरील शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय आदी निर्णय घेतले आहेत. 

युवकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्यावर आधारित विविध उपक्रम, रस्ते विकास डांबरीकरण आदी कामांचा समावेश असणार आहे. सागरमाला योजनेतून खाड्यांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रायगड व ठाणे येथील खाड्या असून दुसऱ्या टप्प्यात कर्ली देवबाग, देवली, वेंगुुर्ले आणि मालवण येथील खाड्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणी जेटीच्या माध्यमातून नवीन उद्योग निर्मिती करण्यात येणार आहे. या ठिकाणी पिकणाऱ्या हापूस आंब्याला आखाती देशात मार्केट मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी कृषी विभाग आणि मेरीटाईम बोर्डाची मदत घेतली जाणार आहे. 

सिंधुदुर्गासह राज्यातील अन्य विमाततळावर विमाने उतरण्यासाठी खासगी विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध योजना स्वच्छतेसाठी, शहराचा विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेला निधी नेमका कसा आणि कोठे खर्च करण्यात यावा, यासाठी सर्वसामान्य नागरिकांना विश्‍वासात घेतले जाणार आहे. याबाबत कोणाला सूचना द्यायच्या असतील तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र पाठवावे. 

सिंधुदुर्गसाठी काय...? 
*तिलारीचे पाणी मालवणपर्यंत नेण्यास मंजुरी 
*रखडलेल्या तळवणे पुलाच्या कामासाठी निधी 
*वणवे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार 
*सिंधुदुर्ग ते पालघर काजू विकास आराखडा राबविणार 
*सिंधुदुर्गात खेकड्यांच्या शेतीला प्रोत्साहन देणार 
*जिल्ह्यात फास्ट ट्रॅक न्यायालयासाठी प्रयत्न 

दर्जेदार रस्त्यांसाठी ऍम्युनिटी स्किम 
या वेळी केसरकर म्हणाले, ""महामार्ग किंवा राज्यमार्गाचे काम झाल्यानंतर ते रस्ते निकृष्ट कामामुळे नेहमीच वादात सापडतात. त्यामुळे गैरप्रकार टाळण्ययासाठी ऍम्युनिटी स्किम राबविली जाणार आहे. त्या माध्यमातून रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडे त्या रस्त्याची जबाबदारी बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे दर्जा टिकण्यास मदत होणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com