अलिबाग - रायगड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा पडला आहे. रायगड पोलिस क्षेत्रात वर्षभरात तीन हजार 216 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये खून, दरोडे, चोरी, बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा गुन्ह्यांचा भरणा आहे. यापैकी 78 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 22 टक्के गुन्ह्यांतील आरोपी मोकाट आहेत.
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात दिवसाला 8 ते 10 गुन्ह्यांची नोंद होत आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. अधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढले आहे. 2016 या वर्षभरात घडलेल्या तीन हजार 216 गुन्ह्यांपैकी दोन हजार 543 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. वर्षभरात रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत 57 बलात्काराचे; तर 111 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. यापैकी बलात्काराच्या 56; तर विनयभंगाच्या 110 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी यश मिळवले. 2015 या वर्षात बलात्काराचे 94; तर विनयभंगाचे 108 गुन्हे घडले होते. गर्दीच्या ठिकाणी व महाविद्यालय परिसरात गस्त घालणारे दामिनी पथक; तसेच जनजागृती व रोडरोमियोंवर केलेल्या कारवाईमुळे या गुन्ह्यांत घट झाली आहे.
गुन्ह्याचा प्रकार - घडलेले गुन्हे - उघडकीस आलेले गुन्हे
खून - 37 - 32
खुनाचा प्रयत्न - 13 - 11
दरोडा - 10 - 10
चोरी - 63 - 39
घरफोडी - 232 - 70
बलात्कार - 57 - 56
अपहरण - 83 - 67
इतर - 2 हजार 748 - 2 हजार 258
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.