उसळली बहुजन क्रांती मोर्चाची लाट 

bahujan kranti morcha
bahujan kranti morcha

रत्नागिरी - एकच पर्व.. बहुजन सर्व, अशा गगनभेदी घोषणा देत शहराजवळील आज चंपक मैदानात बहुजन क्रांती मोर्चाची लाट उसळली. अठरा पगड जातींच्या या क्रांती मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. मोर्चाचे नियोजन नेटके होते. जिल्ह्यातील चोवीस संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या. बहुजनांच्या मूलभूत हक्कासाठी बहुजन समाज एकाच छत्राखाली आला. त्यानंतर सभेचे रुपांतर मोर्चात झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. 

बहुजन क्रांती मोर्चासाठी संयोजकांकडून अपेक्षित वातावरण निर्मिती न झाल्याचा समाज एकत्रित आणण्यावर परिणाम झाल्याचे आज दिसून आले. कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे चंपक मैदानावर शिस्त दिसत होती. व्यासपीठावर येणाऱ्यांसाठी मानवी साखळी तयार केली होती. येणाऱ्या मोर्चेकरांना नियोजनानुसार बसविण्यात येत होते. पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कोणताही गोंधळ उडाला नाही. अकरानंतर व्यासपीठावरून भाषणे सुरू झाली. या वेळी कृती समितीचे कुमार शेट्ये, अशोक पाखरे, दीपक राऊत, बशीर मुर्तुझा, चंद्रकांत परवडी, गीता राठोड, क्रांती मोर्चा मुंबईचे सुरेशदादा पाटील, सुरेश भायजे, पांचाळ सुतार समाज मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष कृष्णकुमार काणेकर, शब्बीर अन्सारी यांच्यासह विविध समाज संघटनांचा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती मोर्चाच्या घोषणांनी चंपक मैदान दणाणून गेले. 

जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यातील बहुजन समाज संघटना एकत्र झाल्या होत्या. चंपक मैदान येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या सुरवातीला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाची रुपरेषा विषद केली. अठरा पगड जातींचा हा बहुजन समाज आजही मूलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित आहे. अद्याप ओबीसी आणि भटक्‍या विमुक्त समाजाची जातीनिहाय गणना झालेली नाही. नॉनक्रिमिलेअरची अटही जाचक असल्याने बहुजन समाजाच्या मुलांना उच्चशिक्षण घेणे अवघड झाले आहे. ओबीसी, भटक्‍या विमुक्त जातीच्या समस्या दूर व्हाव्यात, ओबीसी आणि भटक्‍या विमुक्त समाजाची जातीनिहाय गणना व्हावी, शेतकरी, बागायतदार यांना शंभर टक्के कर्ज माफी मिळावी, ऍट्रासिटी कायदा अधिक कडक करावा, त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र्य न्यायालय उभे करावे आदी 37 मागण्या नमूद करण्यात आल्या. 

भाषणभाजी लांबल्याने मोर्चेकरी उन्हामध्ये तापून निघाले होते. पाणी आणि वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी एकच्या सुमारास सभेचे महामोर्चात रुपांत झाले. उद्यमनगर, मारुती मंदिर, जिल्हा रुग्णालयानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

संयोजकांनी आटोपते घेतले 
मैदानावर झालेली गर्दी आणि कडाक्‍याच्या उन्हामुळे आलेले मोर्चेकरी चांगलेच तापले होते. अनेकांनी शाल गुंडळून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. एक पोलिस कर्मचारी तर या उन्हात चक्कर येऊन पडला. मोर्चेकरांच्या भावनांचा विचार करून संयोजकांनी सभा आटोपती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com