थंडी वाढल्याने चांगल्या उत्पन्नाची संधी

थंडी वाढल्याने चांगल्या उत्पन्नाची संधी

सावंतवाडी - वातावरणात जाणवणारी थंडी ही आंबा, काजू बागायतींना अनुकूल असून यंदा बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. पिकांना चांगला मोहोर आला असल्यामुळे बागायतदार सुखावले आहेत. कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कृषी विभागाने तयार केलेल्या आंबा-काजू पीक संरक्षण वेळापत्रकाचा फायदा बागायतदारांच्या समस्या कमी करण्यासाठी होऊन बऱ्यापैकी उत्पन्न मिळणार आहे. जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात आंबा व काजू कलम बागायतींना बऱ्यापैकी मोहर लागला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ठिकठिकाणांच्या बागायतदारांना काळजी असते ती म्हणजे किडरोगाची. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना अनुकूल वातावरण निर्माण झाले तरी किडप्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते, त्यातच वेळ व श्रम वाया 
जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्ह्यातील बागायतदारांची नुकसानी बऱ्याच प्रमाणात कमी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने आंबा काजू पीक संरक्षण वेळापत्रकाचा आराखडा तयार केला आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या उत्तरार्धात त्याची माहिती कृषी कार्यालयाला देण्यात आली.

मोहर लागण्याच्या काळात त्याची अमंलबजावणी आता आंबा काजू पीक उत्पादनवाढीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली. जिल्ह्यात वेंगुर्ला, देवगड व सावंतवाडी व कुडाळच्या काही भागात आंबा व काजू बागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. वातावरण अनुकूल असले तरी किडरोगाने बागायतदारानां हवालदिल बनण्याची वेळ येते. यात आंबा या पिकांवर तुडतुडे, मीज माशी, फुलकिडे, भुरी, करपा असे किडींचे रोग निर्माण होतात. मोहर लागण्याच्या कालावधीत यातील बऱ्याच रोगाचे प्रमाण वाढले जाते. यासाठी आता कोकण कृषी विद्यापीठाने पीक संरक्षण वेळापत्रकात सहा फवारण्या निश्‍चित केल्या आहेत. आंबा पिकासोबत जिल्ह्यात काजू पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण बरेच मोठ्या प्रमाणात आहेत; परंतु काजू कलम बागायतदारांचा विचार करता कलमी वृक्षांना कीड प्रादुर्भावाचा बराच त्रास सहन करावा लागतो. यात टी-मॉस्कोटो ही डासासारखी कीड कलमांना बरीच त्रासदायक ठरते. रोठा व फुलकिडे कलमे व इतर काजू बागायतीत दिसून येते. त्यामुळे ऐन वेळी मोहर येऊनही हातचे पीक जाण्याचे वेळ बागायतदारांवर येते. कोकण विद्यापीठान येथील कृषी विभागाशी संपर्क साधून हवामान बागायतदारांच्या समस्या लक्षात घेता. आंबा काजू पीक संरक्षण वेळापत्रकाचा आराखडाच तयार केला आहे. यात कोणत्या वेळी कोणत्या औषधाची फवारणी करावी व ती किती प्रमाणात करावी याबाबत कृषी विभागाकडे आराखडा दिला आहे. त्यानुसार कृषी पीक संरक्षण करण्यावर भर देण्यात येणार आहे असे कृषी विभाकडून कळविण्यात आले आहे. 

परदेशी बाजारपेठेचे वेध
आंबा, काजू पीक संरक्षण वेळापत्रकामुळे पीक संरक्षण मिळण्यासोबत बागायतदारांना उत्पन्नही बऱ्यापैकी होणार आहे. यंदा पाऊसमान चांगला आहे. थंडीही चांगली आहे, त्यामुळे मोहोर व फलधारणा चांगल्या प्रकारे होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. आंबा व काजूना परदेशी बाजारपेठात चांगली किंमत मिळावी, यासाठी पीक संरक्षण आरखड्याचा फायदा होणार तसेच कीड प्रादुर्भाव समस्येवर कमी खर्चात नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असे कृषी अधिकऱ्याकंडून सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com